दिंडी, प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून सामान्य माणसाला विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत जीवन जगण्याचा नवा मार्ग दाखविण्याचे प्रबोधन स्व. दादासाहेब काळमेघ यांनी केले.
स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या २९व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात मान्यवरांचे गौरवोद्गार
दिंडी, प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून सामान्य माणसाला विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत जीवन जगण्याचा नवा मार्ग दाखविण्याचे प्रबोधन स्व. दादासाहेब काळमेघ यांनी केले. शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदावर कुलगुरू म्हणून कार्य करत असतानाच अध्यात्म क्षेत्रातही प्रबोधन करणारे ते इतिहासातील पहिले आणि शेवटचे कुलगुरू होते, असे गौरवोद्गार रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी काढले.

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या २९व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूरचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक शैलेष पांडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाष बेलसरे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे तसेच विशेष अतिथी म्हणून सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज उपस्थित होते.

यावेळी मंचावर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. गजानन पुंडकर, अॅड. भैय्यासाहेब पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, सदस्य केशवराव गावंडे, जनार्दन खोटरे, सुभाष बनसोड, सचिव वि. गो. ठाकरे, स्वीकृत सदस्य डॉ. अंबादास कुलट, अमोल महल्ले तसेच स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे सचिव व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ उपस्थित होते.

डॉ. आवलगावकर पुढे म्हणाले की, समाजात वावरताना टीका-टिप्पणीची पर्वा न करता दादासाहेबांनी आपल्या कार्याचा सरळ मार्ग कायम ठेवला आणि अनेकांच्या जीवनात नवसंजीवनी निर्माण केली. अध्यात्म हीच खरी शक्ती असून त्यांनी विज्ञानाच्या उंचीला स्पर्श करत अध्यात्माचीही सर्वोच्च उंची गाठली. माणसामध्ये देव शोधणाऱ्या संत गाडगे बाबा आणि भाऊसाहेबांचा वारसा त्यांनी पुढे नेला. विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा विचार करणारे ते द्रष्टे नेतृत्व होते.

दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक शैलेष पांडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दादासाहेबांनी नागपूर विद्यापीठात आपल्या अधिकाराचा वापर करून हजारो विद्यार्थी आणि सर्वसामान्यांचे कल्याण केले. त्यांच्या परिसस्पर्शाने अनेकांचे जीवन उजळले असून त्यांच्या कार्याची दखल इतिहास आजही घेत आहे आणि भविष्यातही घेतली जाईल. त्यांचे विचार समाजासाठी कायम प्रेरणादायी राहतील.

यावेळी डॉ. महेंद्र ढोरे आणि सुभाष बेलसरे यांनीही दादासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्याशी संबंधित अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन देशमुख यांनी दादासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. प्रास्ताविकात हेमंत काळमेघ यांनी दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानच्या स्थापनेमागील भूमिका तसेच दादासाहेबांच्या विचारांवर आधारित सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याचबरोबर दादासाहेबांवर प्रेम करणाऱ्या हजारो नागरिकांचे आभारही त्यांनी मानले.

कार्यक्रमात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी प्रबोधनपर कीर्तन सादर करत दादासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा वेध घेत विविध सामाजिक विषयांवरही प्रभावी प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंदा नांदूरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरसेवक डॉ. राजेंद्र तायडे यांनी केले. या कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद, स्व. दादासाहेब काळमेघ यांच्यावर प्रेम करणारे ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, कर्मचारी तसेच सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.