मलकापूरचे माजी आमदार चैनसुखजी संचेती यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उन्नत आणि दर्जेदार कापूस बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
केंद्र सरकारच्या 'कापूस क्रांती' उपक्रमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांचे वितरण; उत्पादनवाढीसाठी नव्या तंत्रज्ञानावर भर
मलकापूर (Cotton Development Programme) : कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून त्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरात राबविण्यात येत असलेल्या 'कापूस विकास कार्यक्रम' (कापूस क्रांती) अंतर्गत मलकापुरात विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मलकापूरचे माजी आमदार चैनसुखजी संचेती यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उन्नत आणि दर्जेदार कापूस बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान बोलताना माजी आमदार चैनसुखजी संचेती यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी कल्याणाशी संबंधित धोरणांचा उल्लेख करत शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, "शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकार सातत्याने विविध योजना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे. पारंपरिक शेती पद्धतीसोबत आधुनिक तंत्रांचा अवलंब करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतल्यास कापसाचे अधिक उत्पादन घेणे शक्य होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधींचा प्रभावीपणे उपयोग करून आर्थिक प्रगती साधावी."
या कार्यक्रमाला परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी भाजपचे स्थानिक नेते व पदाधिकारी संजय गावंडे, केदार इकडे, सुभाष चव्हाण, अमित चौबे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कृषी क्षेत्रातील जाणकार उपस्थित होते.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकरी बांधवांनी केंद्र सरकारच्या 'कापूस विकास कार्यक्रम' तसेच माजी आमदार चैनसुखजी संचेती यांच्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले.
केंद्र सरकारचा 'कापूस विकास कार्यक्रम' हा जमिनीच्या सुपोषणापासून ते आधुनिक आणि दर्जेदार बियाण्यांच्या उपलब्धतेपर्यंत शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.