चोंढी गावातील नाला खोलीकरण व सरळीकरण कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.
१ मे पर्यंत चौकशी करावी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा!
मानोरा (Corruption Allegation) : तालुक्यातील चोंढी गावात जलसंधारण लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद उपविभाग मंगरूळपीर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या नाला खोलीकरण व नाला सरळीकरण कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत विजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल मंजूर करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच १ मेपर्यंत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
विजय राठोड यांच्या म्हणण्यानुसार, नाला खोलीकरणाचे काम निविदा प्रक्रिया न राबवता थेट ठेकेदाराला देण्यात आले. शेतकऱ्यांची संमती न घेता जलसंधारण विभागाने काम सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कामात शासनाने ठरवून दिलेल्या लांबी, रुंदी व खोलीच्या निकषांचे पालन न करता निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून, लाखो रुपयांचा निधी गैरप्रकारे हडप करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच अभियंत्यांनी तयार केलेल्या मोजमापन पुस्तिकेतील नोंदींची काटेकोर तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, १ मे २०२६ पर्यंत योग्य कारवाई न झाल्यास वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या तक्रारीमुळे मानोरा तालुक्यातील जलसंधारण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.