वर्धा-चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्यानंतर वर्धा जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आणि हताशेचे वातावरण निर्माण
वर्धा (Congress Protest) : वर्धा-चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्यानंतर वर्धा जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आणि हताशेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी या घटनेला "काँग्रेसच्या विचारांशी गद्दारी" असे संबोधत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
"देशभरात राहुल गांधी भाजपविरोधात प्राणपणाने लढत आहेत आणि इथे अधिकृत उमेदवारानेच माघार घेतली. मग सामान्य कार्यकर्त्यांनी कोणाकडे पाहायचे?" असा सवाल अनेक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेत शैलेश अग्रवाल यांच्या निषेधार्थ ‘फोटोला जोडे मारा’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, "समस्त वर्धा जिल्ह्यातील काँग्रेसला खाली पाहायला लावणारी ही दुर्दैवी घटना आहे," अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांच्या मनातील संताप एवढा तीव्र आहे की, शैलेश अग्रवाल यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी आता उघडपणे पुढे येत आहे. "आम्ही गावागावात पक्षासाठी संघर्ष करतो, जनतेसमोर भाजपविरोधात भूमिका मांडतो आणि शेवटी आपलाच उमेदवार माघार घेतो, हे वेदनादायक आहे," अशा भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
या निषेधार्थ शुक्रवार, ५ जून रोजी दुपारी ४ वाजता इंदिरा सद्भावना भवन, बॅचलर रोड, वर्धा येथे आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विधान परिषद निवडणुकीतील ही घडामोड केवळ राजकीय नसून, अनेक जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारी ठरल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष संघटनेत या विषयावर आणखी तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.