भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात रुपया डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत आला.
लातूर (Congress Protest) : भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात रुपया डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत आला. या मोदींनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर रुपयाच्या घसरणेबद्दल बोलताना पंतप्रधानाची इज्जत घसरते, असे वक्तव्य केले होते. अशा घर बुडव्या, राज्य बुडव्या व देश बुडव्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता सोडावी. सोने खरेदी करू नका, फोडणीला तेल कमी वापरा, पेट्रोल डिझेल कमी वापरा असा सल्ला जनतेला देणाऱ्या पंतप्रधानांचा काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत धिक्कार नोंदविण्यात आला.
बुधवारी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी अशा पंतप्रधानांचा सर्वसामान्य जनतेने धिक्कार करावा, अशा सत्ताधाऱ्यांविरुद्ध अनादर आणि असहकार चळवळ करावी, असे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा देशातील जनतेला आवाहन करताना एक वर्षभर सोने खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेल कमी वापरा, खाद्य तेल कमी वापरा असे सांगितले. या आवाहनातून देशाच्या आर्थिक व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे एक प्रकारे कबूल केल्याचा आरोप साळुंखे यांनी केला. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वसामान्य जनता गेल्या दोन दिवसांपासून अत्यंत चिंतेत असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव, माजी उपमहापौर कैलास कांबळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्याबद्दल टीका करताना पंतप्रधानाची इज्जत काढली होती. त्यानंतर सत्तेवर आल्यापासून मोदी यांच्या कार्यकाळात सतत डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत गेला. त्यामुळे सहाजिकच मोदी यांची इज्जत घसरत गेली, असा आरोप यावेळी करण्यात आला.
परवा केलेले त्यांचे आवाहन हे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणारे असल्याचे सांगत साळुंखे यांनी पंतप्रधानांवर टीका केली. पेट्रोल-डिझेल कमी वापरा, परदेश दौरे करू नका असे आवाहन करणाऱ्या पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर लगेच गुजरातमध्ये रोडशो केला आणि त्यानंतर परदेश दौऱ्यावर गेले, अशी टीकाही त्यांनी केली. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान' अशा पद्धतीच्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात देशाचे वाटोळे झाले असल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधानांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
सर्वसामान्य जनतेने अशा पंतप्रधानांना असहकार करावा, अनादर करावा आणि सरकारविरोधात असहकार चळवळ उभारावी, असे आवाहन साळुंखे यांनी केले.
नीट पेपर फुटी हे सरकारचे अपयश!
नीट परीक्षा पेपर फुटीमुळे देशातील जवळपास 25 ते 26 लाख विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक परेशान झाले आहेत. नीट परीक्षेसाठी हे लाखो विद्यार्थी दोन वर्षे जीवतोड मेहनत घेतात. त्यांचे पालकही आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी कष्ट उपसतात. मात्र भाजप सरकारच्या कार्यकाळात गेल्या काही वर्षांमध्ये नीट पेपर फुटीची प्रकरणे घडल्याचा आरोप करण्यात आला.
यामुळे दरवर्षी 25 ते 26 लाख विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांना मनस्ताप सहन करावा लागतो. हे सर्व अपयश सरकारचे असल्याचे सांगत साळुंखे यांनी यावर्षी तसेच भविष्यात नीट परीक्षा देणारे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांनी सरकारविरोधात अनादर आणि असहकार चळवळ उभारावी, असे आवाहन केले.