मंत्री आणि भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी राजकारणातून एक्झिट घेण्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राजकारणातून एक्झिटच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना वेग; देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधानपदावरील दाव्यावरही वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
मंत्री आणि भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी राजकारणातून एक्झिट घेण्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडेंना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले आहे. त्यांनी पंकजा मुंडेंनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हावे, असे आवाहन करत काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे म्हटले आहे.
पंकजा मुंडेंच्या अलीकडील विधानानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले असून, आता पंकजा मुंडे कोणता निर्णय घेतात, याकडे कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ओबीसी नेतृत्वाला बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पक्षामध्ये न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण झाल्यास अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी नमूद केले. पंकजा मुंडेंनी भाजपमधून बाहेर पडून निर्धाराने नेतृत्व करावे आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याच्या दिशेने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. काँग्रेस त्यांचे स्वागत करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस भविष्यात पंतप्रधान होतील, असे बाळासाहेब फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरही विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नागपूर येथे बोलताना त्यांनी सांगितले की, एखाद्या नातेवाईकाने किंवा भावाने अशी अपेक्षा व्यक्त करणे स्वाभाविक आहे. मात्र, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सध्या गुजरातमधील नेतृत्वाकडे असल्याचे त्यांनी म्हटले.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, आमची सत्ता आली तर आमचे नेतृत्व पंतप्रधानपदाबाबत निर्णय घेईल आणि त्यांची सत्ता राहिली तर ते निर्णय घेतील. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जागी महाराष्ट्रातील एखादा मराठी व्यक्ती पंतप्रधान झाला, तर तो आनंदाचा क्षण असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.