नको ते आणि अति जास्तीचं बोलल्याने आपण आपलीच किती थंडी करुन घेतो हे आपण सर्वांनीच अनेकदा अनुभवलं आहे
कटाक्ष - ऋषिकेश साधना प्रकाश पोहरे
(Cockroach Janata Party) नको ते आणि अति जास्तीचं बोलल्याने आपण आपलीच किती थंडी करुन घेतो हे आपण सर्वांनीच अनेकदा अनुभवलं आहे, मग ते घरात असो, समाजात असो, किंवा राजकारणात असो. असच काही दिवसा आधी देशातील युवकांना उगाच COCKROACHES आणि PARASITE बोलून उचकून टाकण्यात आलं, ज्यामधूनच 'कॉक्रोच जनता पार्टी' ही जन्माला आली आणि तिचे जवळपास सव्वा दोन कोटीच्या वर फॉलोवर हे अवघ्या चार दिवसात झाले, जे भारतात वर्षानुवर्षे असलेल्या कुठल्याच इतर पक्षाचे आज पर्यंत झाले नाहीत.
सध्या तर फक्त फॉलोवर्स वाढत आहेत, कारण आज तरी पाहिजे तसा त्यांच्याकडे दमदार आणि मुद्देसूद बोलणारा कुणीच नाही पण ज्या दिवशी कुणी योग्य दिशा दाखवणारा सापडणार तेव्हा न आवरता येणारी परिस्थिती होऊन बसणार. कुण्या नेत्या - अधिकाऱ्यावर शिस्तीची किंवा राजीनाम्याची कारवाई करणे म्हणजे पक्षाला कमीपणा घेणे असे होत नाही तर आपण त्याबाबतीत किती संवेदनशील आणि जागरूक आहोत हे दिसून येते. विज्ञानानुसार जगात अणुबॉम्ब पडला तरी कॉक्रोच जिवंत राहतात ! आता हे 'राजकीय कॉक्रोच' एकदा का ईव्हीएम मशीनमध्ये किंवा मतपेटीत शिरले की, तुम्ही त्यांच्यावर कितीही राजकीय हिट मारला तरी ते बाहेर निघणार नाहीत, उलट तुमचीच 'विकेट' काढतील...
युवकांना पॅरासाईट म्हणताना हे विसरण्यात आले की, नोकऱ्या नसल्यामुळे पोरं आधीच घरात बापाच्या शिव्या खात पॅरासाईट सारखीच जगत आहेत. आता घरातल्या बापाला तर ते काही बोलू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्या मनातील तो सगळा फ्रस्ट्रेशनचा आणि बेरोजगारीचा राग ते या नेत्यांवरच काढणार ना...
जगात सर्वात जास्त भारतात युवक आहेत, ज्यामध्ये 50% हे पंचवीस वर्षाच्या आणि 65% टक्के हे पसतीस वर्षाच्या खाली आहे आणि सरासरी वय हे 29 आहे जे लोकसंख्येच्या आकड्यांमध्ये 75 कोटी आणि 97 कोटी इतकी होतात... सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेच ते युवक विद्यमान आणि पुढचे मतदार देखील आहेत. आधीच्या काळात घरात जसं आई-वडील म्हणतील तसं व्हायचं पण आता ते न होता जे मुलं म्हणतील तेच प्रत्येक घरात होते, म्हणजेच याचा अर्थ येणाऱ्या काळात आपल्या घरातून कुणाला मत द्यायचं हा आग्रह देखील हे युवकच करतील आणि ठरवतील, त्यामुळे यांना हलक्यात घेऊन अजिबातच चालणार नाही.
शेवटी कोणी कुठल्याही पार्टीचा नेता किंवा कार्यकर्ता असो, हे जे काही सुरू आहे तो स्वतः पण एकट्यात बसून किंवा स्वतःला आरशात पाहून हे नक्की म्हणेल की अरे हो सालं आहे तर हे चूकच... त्यामुळे या युवकांना एका ठिकाणी बसून नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, काय अपेक्षित आहे, काय अडचणी आहेत हे जाणून घेणं सरकारचं आणि विरोधी पक्षाचे पण तितकंच कर्तव्य आहे...
शहाण्या माणसांनी नेहमी दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकलं पाहिजे, कधी आणि कुठे एका ठिणगी मुळे मोठी आग लागू शकते हे आपण केनिया, इंडोनेशिया, नेपाळ, श्रीलंका, आणि बांगलादेश मध्ये पाहिलं आहेच, शिवाय आपल्याला कडे पण अनेक उदाहरणं आहेत, मग ते वायएसआरसीपी असो, आप असो, टीव्हीके असो किंवा कॉकरोज जनता पार्टी असो, कोण कधी उभा राहील याचा अजीबात नेम नाही.
आपले कडे कॅमेरा दिसला की उत्साहाच्या भरात तोंडात येईल ते बोलून मोकळे होतात आणि मग दुसऱ्या दिवशी घाम पुसत, माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, मीडियाने माझ्या वाक्याचा विपर्यास केला. या नेत्यांना बोलण्यासाठी नाही, तर गप्प बसण्यासाठी पक्षाने एखादी वेगळी 'सबसिडी' द्यायला हवी, कारण वरिष्ठांना आणि पक्षाला त्यांची बाजू सांभाळता सांभाळता नाकी नऊ येऊन जातात... शेवटी हे तर जगजाहीर आहेच कि 'अती इथे माती होतेच' त्यामुळे मोजकं बोला रे हे सांगण्याची वेळ जवळपास आलीच आहे...