जिंतूर तालुक्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सतर्कतेमुळे दोन बालविवाह रोखण्यात आले आहेत.
परभणी (Child Marriage Prevention) : जिंतूर तालुक्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सतर्कतेमुळे दोन बालविवाह रोखण्यात आले आहेत. जिल्ह्यात कुठेही बालविवाह होऊ नयेत, असे आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले होते. या आवाहनाची गांभीर्याने दखल घेत तहसीलदार शीतल कच्छवे व नायब तहसीलदार प्रशांत राखे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व ग्रामपंचायत यंत्रणा सक्रिय झाली आहे.
पहिली घटना कौडगाव येथे घडली. येथे एका अल्पवयीन मुलीला पाहण्यासाठी वरपक्षातील मंडळी आले होते. लग्नाची बोलणी सुरू असल्याची माहिती ग्रामसेवक राजेंद्र पारवे, सरपंच उद्धव नागरे आणि महिला पोलीस पाटील वैशाली नागरे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ गावकऱ्यांसह मुलीच्या घरी भेट दिली. चौकशीत मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा सहा महिने कमी असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी व नागरिकांनी समजूत काढत बालविवाहाचे दुष्परिणाम पटवून दिले आणि विवाहाची बोलणी पुढे ढकलण्यात आली.
दुसरी घटना साखरतळा येथे उघडकीस आली. २९ एप्रिल रोजी येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती तलाठी अंजली लाड, ग्रामसेवक डी. एस. आव्हाड, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना मिळाली. त्यांनी २२ एप्रिल रोजी गावात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट करत त्यांनी बालविवाहाचे कायदेशीर परिणाम समजावून सांगितले. बालविवाह झाल्यास गुन्हे दाखल होऊ शकतात, याचीही जाणीव करून दिली. त्यानंतर पालकांनी मुलगी सज्ञान झाल्यानंतरच विवाह करण्याचे आश्वासन दिले.
या दोन्ही घटनांमुळे प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक होत असून, बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेविरुद्ध जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.