Chikhali Samata Rath: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २००व्या जयंती वर्षानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “समता रथ”चे
चिखली (Chikhali Samata Rath) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २००व्या जयंती वर्षानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “समता रथ”चे आज चिखली शहरात उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात आगमन झाले. सामाजिक समता, स्त्री शिक्षण आणि परिवर्तनाचा संदेश घेऊन महाराष्ट्रभर प्रवास करणाऱ्या या रथाचे नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला हा “समता रथ” (Chikhali Samata Rath) राज्यभर सामाजिक जागर घडवत असून बुलडाणा जिल्ह्यात विभागीय अध्यक्ष वसंतराव मगर तसेच जिल्हाध्यक्ष संतोष खांडेभराड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी भेट देत आहे. समता रथामध्ये सन १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू झालेल्या भारतातील मुलींच्या पहिल्या शाळेचा ऐतिहासिक देखावा साकारण्यात आला आहे. या माध्यमातून सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेल्या स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि न्यायाच्या कार्याची प्रेरणादायी माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
चिखली शहरात रथाचे आगमन होताच घोषणाबाजी, फुलांची उधळण आणि उत्साही स्वागताने परिसर दुमदुमून गेला. यावेळी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्यासह निलेश गावंडे, समता परिषद शहराध्यक्ष कैलास सपकाळ, श्रीराम झोरे, कुणाल बोंद्रे, दीपक खरात, सागर पुरोहित, विजय जागृत, प्रदीप पचेरवाल, विलास कंटुले, सुदर्शन खरात, विलास चव्हाण, सुभाष खरात, हरिभाऊ राऊत, प्रकाश सपकाळ, अंबादास खरात, प्रशांत भटकर, भरत खरात, रामेश्वर राऊत, रामेश्वर मेहेत्रे, नारायण राऊत, ज्ञानेश्वर मेहेत्रे, राजेश मेहेत्रे, अभय तायडे, सुचित भराड, विजय खरात, विष्णु बळी, जाधव, विष्णु बांडे, प्रल्हाद बांडे, लक्ष्मण बांडे,संकेत खरात आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच युवक, महिला, समाजबांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समता रथाचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांचा प्रभावी जागर करण्यात आला.