भात रोवणीच्या हंगामी कामासाठी तेलंगणात गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजुरांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन चार जणांचा मृत्यू, तर 27 मजूर गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
भात रोवणीच्या कामासाठी गेलेल्या सिंदेवाही तालुक्यातील मजुरांवर काळाचा घाला; रामगुंडम परिसरातील दुर्घटनेने हळहळ
चंद्रपूर: भात रोवणीच्या हंगामी कामासाठी तेलंगणात गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजुरांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन चार जणांचा मृत्यू, तर 27 मजूर गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रामगुंडम परिसरात मजुरांना घेऊन जाणारी पिकअप उलटल्याने हा अपघात झाला. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनपार-पवना गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील पवना चक येथील शेतमजूर दरवर्षीप्रमाणे यंदाही उदरनिर्वाहासाठी भात रोवणीच्या कामासाठी शेजारील तेलंगणा राज्यात गेले होते. दिवसभराचे काम पूर्ण करून ते आपल्या निवासस्थानी परतत असताना रामगुंडम परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला.
प्राथमिक माहितीनुसार, पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. वाहनाचा वेग जास्त असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
या अपघातात अतुल वासुदेव सोनले (45), अर्चना जनार्धन सोनले (40), प्रभा सिताराम मोहर्ले (56) आणि रंजना प्रभाकर शेंडे (50) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
दुर्घटनेत जखमी झालेल्या 27 मजुरांना स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने रामगुंडम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये महिला आणि पुरुष मजुरांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
घटनेची माहिती गावात पोहोचताच मृतांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून मृतदेह मूळ गावी आणण्यासाठी तसेच जखमींना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.