इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा परिसरात पर्यटक कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पीडित पर्यटकांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनाक्रम उघड केला आहे.
भावली धबधब्यावर किरकोळ वादानंतर संतप्त तरुणांकडून अनेक ठिकाणी हल्ल्याचा आरोप; गाडीची तोडफोड, दगडफेक, रॉडने हल्ल्याचा प्रयत्न; नऊ आरोपी अटकेत, एक फरार
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा परिसरात पर्यटक कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पीडित पर्यटकांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनाक्रम उघड केला आहे. महिलेला अश्लील टिप्पणी केल्याचा जाब विचारल्यानंतर काही स्थानिक तरुणांनी संतप्त होत कुटुंबाचा अनेक किलोमीटर पाठलाग केला, वाहनाची तोडफोड केली, दगडफेक आणि लोखंडी रॉडने हल्ल्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीडितांनी केला आहे. जीव वाचवण्यासाठी अनेक वेळा मार्ग बदलत अखेर अंबड पोलीस ठाणे गाठल्याची माहिती त्यांनी दिली.
पीडित महिलेने सांगितले की, १२ जुलै रोजी त्या कुटुंबासह भावली धबधब्यावर फिरण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास तेथे पोहोचल्यानंतर सर्वांनी सोबत आणलेले जेवण केले. त्यानंतर काही वेळ धबधब्याच्या पाण्यात मुलांसह आनंद लुटला. पाण्यातून बाहेर आल्यानंतर थंडी वाजू लागल्याने त्या कपडे बदलण्यासाठी निघाल्या. त्याचवेळी भावली धरणाजवळील छोट्या पुलावर दुचाकीवर उभ्या असलेल्या दोन युवकांनी त्यांच्याकडे पाहून शिट्टी मारली आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने संबंधित युवकांना जाब विचारला. महिलांबद्दल अशा प्रकारे बोलणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी त्यांना सुनावले. त्यानंतर त्या तेथून पुढे निघाल्या. काही क्षणांनी त्यांचे पती आणि दीर तेथे आले. त्यांनीही संबंधित युवकाला महिलांशी अशा प्रकारचे वर्तन करू नये, अशी समज दिली. यावेळी किरकोळ धक्काबुक्की झाली आणि तो युवक घाबरून तेथून निघून गेला.
मात्र यानंतर परिस्थिती अधिक चिघळली. पुलाजवळच सामान विक्री करणाऱ्या ठिकाणी उभे असलेल्या आठ ते दहा युवकांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी पर्यटक कुटुंबाला घेरले. "आमच्या गावात येऊन दादागिरी करता का?" असे म्हणत त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली आणि काही वेळ हातघाईची परिस्थिती निर्माण झाली. स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळे केले. त्यानंतर पर्यटक कुटुंबाने तेथून तातडीने निघण्याचा निर्णय घेतला. मात्र निघताना एका युवकाने "पुढे बघतो तुम्हाला" असा इशारा दिला होता, असे महिलेने सांगितले.
घटना तेथेच संपली असे वाटत असतानाच काही अंतर पुढे गेल्यानंतर भरधाव वेगाने आलेल्या बलेनो कारने त्यांच्या वाहनाचा रस्ता अडवला. कारमधून उतरलेल्या युवकांनी गाडीच्या चालकाच्या बाजूच्या पुढील आणि मागील काचा फोडल्या. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गाडीतील महिला, लहान मुले आणि इतर नातेवाईक घाबरून गेले. चालकाला तातडीने वाहन पुढे घेण्यास सांगितल्यानंतर स्पीड ब्रेकर ओलांडत त्यांनी कसाबसा तेथून मार्ग काढला.
यानंतरही आरोपींनी पाठलाग सुरूच ठेवला. दुचाकीवरून आलेल्या काही युवकांच्या हातात लोखंडी रॉड होत्या. त्यांनी गाडीवर रॉड फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्या गाडीला लागल्या नाहीत. मुलांनी मागे दुचाकीवरून येणाऱ्या युवकांचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यांची ओळख पटू शकेल, असेही पीडितांनी सांगितले.
पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, पहिला हल्ला भावली धरण परिसरात झाला. त्यानंतर नाशिक-मुंबई महामार्गावरील फ्लायओव्हरजवळ दुसऱ्यांदा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर गोटी टोल नाक्यावर तिसऱ्यांदा आरोपी पुन्हा त्यांच्या वाहनापर्यंत पोहोचले. टोल लेनमध्ये वाहतूक असल्याने वाहन पुढे नेता येत नव्हते. आरोपी शेजारच्या लेनमधून धावत आले आणि दगड घेऊन वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या परिस्थितीत चालकाने वाहन रिव्हर्स घेत दुसऱ्या लेनमधून बॅरिकेड तोडत तेथून सुटका केली.
हल्लेखोरांनी काही किलोमीटर पुढे पुन्हा त्यांच्या वाहनाला अडवले. यावेळी एका युवकाने थेट कारला लटकून आत बसलेल्या त्यांच्या चुलत भावाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला. सुमारे २०० ते ५०० मीटरपर्यंत तो युवक वाहनाला लटकलेला होता. वाहन थांबवले असते तर सर्वांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, तर वेग वाढवला असता त्या युवकाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. त्यामुळे अत्यंत भीतीच्या वातावरणात वाहन चालवावे लागल्याचे त्यांनी सांगितले.
काही अंतरानंतर तो युवक वाहनावरून खाली पडला. त्यानंतर त्यांनी इगतपुरीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आरशातून पाहिले असता आरोपींची बलेनो कार पुन्हा पाठलाग करत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी दिशा बदलत पुन्हा नाशिकच्या दिशेने धाव घेतली.
गोंदे दुमाला परिसरातील फ्लायओव्हरजवळ सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक संथ होती. समोर ट्रक उभे असल्याने वाहन पुढे नेता येत नव्हते. याच संधीचा फायदा घेत आरोपी पुन्हा त्यांच्या वाहनाजवळ आले. त्या वेळी महिलेने स्थानिक नागरिकांना मदतीसाठी आर्त हाक मारत, "आम्हाला वाचवा, हे आम्हाला मारून टाकतील," अशी विनंती केली. त्यानंतर कसेबसे तेथून बाहेर पडत त्यांनी थेट अंबड पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण घटनेची तक्रार नोंदवली.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सोशल मीडियावर या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवत नऊ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील एक कुख्यात गुन्हेगार अद्याप फरार असून तो पालघर परिसरात पळाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी-भावली परिसरात घडलेल्या या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.