चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील भालगाव (ता. चिखली) येथे वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली.
भालगाव (Bhalgav Development) : चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील भालगाव (ता. चिखली) येथे वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून गावाला स्वतःची सार्वजनिक विवाह व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध झाली आहे. सुमारे पाच हजार लोकसंख्येच्या या गावात आतापर्यंत शाळेच्या प्रांगणातच सर्व कार्यक्रम पार पडत होते.
ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सरपंच सौ. मीना संतोष परीहार, उपसरपंच व सदस्यांनी अतिक्रमित व अस्वच्छ सार्वजनिक जागा मोकळी करून तिचा विकास केला. या कामासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यामधून कंपाऊंड वॉल, प्रवेशद्वार व स्टेज उभारण्यात आले.
या नव्या जागेवर २६ एप्रिल २०२६ रोजी पहिला विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव व आमदार श्वेताताई महाले पाटील यांची उपस्थिती लाभली.
‘हागणदारी’ ते ‘तोरणादारी’
कधी काळी उपेक्षित आणि अस्वच्छ असलेली ही जागा ग्रामस्थांच्या एकजुटीने पूर्णतः बदलली. महिलांच्या सहभागातून व ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून ही भूमी आता धार्मिक, सांस्कृतिक व मंगलकार्यांचे केंद्र बनली आहे. अलीकडेच येथे सावित्रीमाता सप्ताहही मोठ्या उत्साहात पार पडला.
डोमची मागणी
दरम्यान, या ठिकाणी पावसाळ्यात कार्यक्रम घेता यावेत यासाठी टिनशेड डोम (छत) उभारण्यात यावे, अशी मागणी सरपंच मीना परीहार यांनी आमदारांकडे केली आहे. “हे काम पूर्ण झाल्यास गावाला वर्षभर सामूहिक कार्यक्रमांसाठी मोठी सुविधा मिळेल,” असे त्यांनी सांगितले.
गावकऱ्यांच्या मते, हा बदल केवळ विकासाचा नाही तर एकतेचा आणि नव्या आशेचा जिवंत पुरावा ठरला आहे.