बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला असून आज प्रचाराची सांगता सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
बारामती : विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा समारोप; सुनेत्रा पवार यांचे भावनिक आणि राजकीय वक्तव्य चर्चेत
बारामती (Baramati ByElection) : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला असून आज प्रचाराची सांगता सभा मोठ्या उत्साहात पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असून संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.
या सांगता सभेत सुनेत्रा पवार यांनी भावनिक तसेच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे विधान करत वातावरण अधिकच तापवले. “आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद आमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात सर्व राजकीय पक्षांचे आणि संस्थांचे आभार मानले. “आदरणीय शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे यांचे मी विशेष आभार मानते,” असे सांगत त्यांनी राजकीय शिष्टाचार पाळत सर्वांना एकत्रित धन्यवाद दिले.
त्या पुढे म्हणाल्या की, “ही निवडणूक फक्त सत्तेची नाही, तर बारामतीच्या विकासाच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची जबाबदारी आहे.” अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या विकासकामांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
“दादा गेले असले तरी त्यांची स्वप्न जिवंत आहेत. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज रणांगणात उतरले आहे,” असे भावनिक वक्तव्य करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. “मी तुमच्याकडे फक्त मत मागायला आलेली नाही, तर तुमच्याशी नातं टिकवायला आलेली आहे,” असेही त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी बारामतीच्या विकासाचा उल्लेख करत सांगितले की, “पवार साहेबांच्या दूरदृष्टीतून बारामतीचा पाया रचला गेला आणि अजितदादांच्या कष्टातून त्यावर कळस चढला.” त्यामुळे बारामतीचा विकास हा एक सामूहिक प्रवास असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शारदाबाई पवार यांचे स्मरण करत त्या म्हणाल्या की, “त्यांनी पवार कुटुंबाला संस्कार, संघर्ष आणि मूल्यांची परंपरा दिली. त्या केवळ कुटुंबापुरत्या मर्यादित नव्हत्या, तर महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे.”
आई आशाताई पवार यांच्या आशीर्वादाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “त्यांचा आधार माझ्यासाठी सर्वात मोठी शक्ती आहे.” तसेच त्यांनी सांगितले की बारामतीकरांचा विश्वास आणि पाठिंबा हीच त्यांची खरी ताकद आहे.
सभेच्या शेवटी त्यांनी आत्मविश्वास व्यक्त करत सांगितले की, “बारामतीचा विकास आणि पवार कुटुंबाचा वारसा पुढे नेणे हेच माझे ध्येय आहे.” त्यांच्या या भाषणानंतर बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले असून निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.