अवघ्या एक महिन्याच्या मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच कोल्हापुरातील एका तरुण विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर : अवघ्या एक महिन्याच्या मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच कोल्हापुरातील एका तरुण विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. राजारामपुरी परिसरातील अस्मिता प्रतीकसिंह काटकर यांनी रविवारी (12 जुलै) दुपारी चारच्या सुमारास राहत्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे समोर आले. मात्र, अस्मिताने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या आई-वडिलांनी सासरच्या कुटुंबीयांवर केला आहे.
अस्मिता यांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. त्यांना अवघ्या एक महिन्याची मुलगी आहे. मुलीच्या बारशाचा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी घरात सुरू होती. प्राथमिक माहितीनुसार, कार्यक्रमासाठी हॉल पाहण्यासाठी अस्मिता यांचे पती, सासू आणि सासरे घराबाहेर गेले होते. त्या वेळी अस्मिता घरी एकट्याच होत्या. त्यांनी घराचा मुख्य दरवाजा आतून बंद करून बेडरूममधील छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
कुटुंबीय घरी परतल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वारंवार हाका मारून आणि फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. घरात प्रवेश केल्यानंतर अस्मिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
‘आत्महत्या नाही, आमच्या मुलीची हत्या’
अस्मिताच्या मृत्यूनंतर त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. लग्न झाल्यापासून पैशांसाठी अस्मिताचा छळ केला जात होता, असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला. रोख रक्कम तसेच ऑनलाइन माध्यमातूनही पैसे दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुलीच्या बारशासाठी 52 हजार रुपयांचा पाळणा ऑनलाइन ऑर्डर करण्यात आला होता आणि संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी तगादा लावण्यात येत होता, असा आरोप अस्मिताच्या कुटुंबीयांनी केला. तसेच सासरच्या लोकांनी मुलासाठी कपडे घेऊन ठेवले होते; मात्र मुलगी झाल्यानंतर अस्मिताचा सातत्याने छळ करण्यात आल्याचा आरोपही माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
शुक्रवारी झाले होते शेवटचे बोलणे
अस्मिताच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे मुलीशी शुक्रवारी शेवटचे बोलणे झाले होते. त्या वेळी अस्मिता बारशाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करण्याबाबत बोलत होती. मात्र, रुग्णालय आणि अधिक मासातील कार्यक्रमांवर आधीच मोठा खर्च झाल्याने आणखी खर्च करणे शक्य नसल्याचे त्यांनी तिला सांगितले होते.
अस्मिताच्या आईनेही सासू, सासरा, पती आणि नणंद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या सर्वांनी आपल्या मुलीचा जीव घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गळ्यावर जखमा; व्हिसेरा राखीव
घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. अस्मिताच्या गळ्यावर काही जखमा आढळल्याचे पोलिसांनी सांगितले असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.
लग्नानंतर सात वर्षांच्या आत विवाहितेचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यास कायदेशीर प्रक्रियेनुसार न्यायाधीश आणि इतर पंचांच्या उपस्थितीत पंचनामा व शवविच्छेदन केले जाते. त्यानुसार सोमवारी सकाळी न्यायाधीशांच्या उपस्थितीत पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अवघ्या वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या आणि एक महिन्याच्या मुलीची आई असलेल्या अस्मिताने आत्महत्येचे पाऊल नेमके का उचलले, याचा तपास पोलीस करत आहेत. दुसरीकडे, माहेरच्या कुटुंबीयांनी केलेले हत्या आणि छळाचे आरोपही तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. राजारामपुरी पोलीस सासरच्या तसेच माहेरच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून प्रकरणातील सर्व बाबींची चौकशी करत आहेत.