Manora Nagar Panchayat: शहरातील नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून लोखंडी अँगल उभारल्याची तक्रार वसंतराव नाईक विद्यालयांचे मुख्याध्यापकासह नागरिकांनी दि. ८ जुलै रोजी नगरपंचायत..
मानोरा (Manora Nagar Panchayat) : शहरातील नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून लोखंडी अँगल उभारल्याची तक्रार वसंतराव नाईक विद्यालयांचे मुख्याध्यापकासह नागरिकांनी दि. ८ जुलै रोजी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे. मुख्याधिकारी यांना दिलेल्या तक्रार निवेदनात नमूद केले आहे की, मौजे मानोरा पुण्यनगरी वार्ड क्र. ७ मधील शाळेच्या व शेत सर्वे क्र. ६७/१ व एन ए.कडे जाणाऱ्या सार्वजनिक मुख्य ९ मीटर रुंद असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून लोखंडी अँगल उभारण्यात आले आहेत. याबाबत वसंतराव नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक व समस्त नागरिक यांनी गैरअर्जदार अमीन शाह अमीर शाह यांच्या विरोधात मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांनी म्हटले आहे की, वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे नियोजित शाळेच्या व सार्वजनिक तसेच शेत सर्वे क्र. ६/२ कडे जाणाऱ्या रस्त्यावर अमीन शाह अमीन शाह रा. पुण्यनगरी मानोरा वार्ड क्र. ७ यांनी ९ मीटरचा अर्धा रस्ता अडवून त्यावर लोखंडी अँगल गाडून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अर्धवट झाला आहे. सदर अतिक्रमणामुळे शाळेकरी मुली व पालकांना व नागरिकांना प्रचंड त्रास होऊन गैरसोय होत आहे. तसेच भविष्यात अग्निशमनची वेळ आल्यास अग्निशमन दलाची गाडी तसेच रुग्णवाहिका यांचा प्रवेशात मोठा अडथळा होणार आहे.
महाराष्ट्र नगर परिषदा व नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम कलम १५६ (१) प्रमाणे सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करणे दंडनीय अपराध आहे. महाराष्ट्र नगर परिषदा/नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५०(१) आणि १६४(२) अंतर्गत दंडनीय अपराध आहे. त्यामुळे मुख्य अधिकारी यांना सूचना न देता अतिक्रमण हटविण्याचा अधिकार आहे. तरी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सार्वजनिक रस्त्यावरील केलेले अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे.
निवेदनावर मुख्याध्यापक यांच्यासह शब्बीर खा दाऊद खान, तुळशीराम मसाजी डेरे, विवेकानंद राऊत, खैरू निसा शेख गुलाब शेख, राधिकाबाई कानडे, स्मिता देशमुख, गंगाबाई पांडुरंग राठोड, अविनाश वामराव लोथे, अनुप राठी , विशाल राठोड, सुभाष शिंदे, विलास पवार, चरण जाधव, शामराव पवार, अनिल शिंदे, बापूराव राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.