भारतात स्मार्टफोन बाजारात मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. कंपन्यांनी फोन किमती वाढवले आहेत, कारण AI कंपन्यांमुळे RAM आणि NAND चिप्सची उच्च मागणी वाढली आहे. या कारणामुळे फ्लॅगशिप आणि बजेट स्मार्टफोनवरही आर्थिक ताण वाढत आहे.
भारतातील स्मार्टफोन बाजारात मोठी दरवाढ सुरू झाली असून, येत्या काही महिन्यांत मोबाईल फोन आणखी महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. OnePlus, Nothing, Redmi, Realme, Motorola यांसारख्या अनेक कंपन्यांनी शांतपणे आपल्या स्मार्टफोनच्या किमती वाढवल्या आहेत. काही मॉडेल्स २ हजार तर काही फ्लॅगशिप फोन ५ ते ६ हजार रुपयांनी महाग झाले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, या दरवाढीमागे ‘RAMageddon’ म्हणजेच RAM आणि NAND मेमरी चिप्सचा जागतिक तुटवडा हे मुख्य कारण आहे. सध्या OpenAI, Google, Microsoft, Meta यांसारख्या AI कंपन्या मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर्स उभारत असून, त्यासाठी प्रचंड प्रमाणात मेमरी चिप्सची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे स्मार्टफोन कंपन्यांना चिप्स महाग दरात खरेदी कराव्या लागत आहेत.
याचा थेट परिणाम भारतीय बाजारात दिसू लागला आहे. OnePlus 15 आणि OnePlus 15R यांसारख्या मॉडेल्सच्या किमती काही महिन्यांतच सुमारे ५ हजार रुपयांनी वाढल्या आहेत. Redmi आणि Realme चे अनेक फोनही २ ते ५ हजार रुपयांनी महाग झाले आहेत.
विशेष म्हणजे आता केवळ फ्लॅगशिपच नाही, तर बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोनवरही याचा परिणाम होत आहे. १५ ते ३० हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये मोठी दरवाढ होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांवर आर्थिक ताण वाढू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, जर RAM आणि NAND चिप्सचा तुटवडा कायम राहिला, तर पुढील एक-दोन वर्षांत स्मार्टफोनच्या किमतींमध्ये २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. यामुळे ग्राहक आता जुने फोन अधिक काळ वापरण्याचा पर्याय निवडत असून, रिफर्बिश्ड फोनच्या बाजारालाही मोठी चालना मिळू शकते.
- स्मार्टफोन २० ते ४०% महाग होण्याची शक्यता
- AI डेटा सेंटर्समुळे RAM-NAND चिप्सची कमतरता
- OnePlus, Redmi, Realmeसह अनेक कंपन्यांनी दर वाढवले
- बजेट आणि मिड-रेंज फोनवरही परिणाम
- २०२७ पर्यंत परिस्थिती कायम राहण्याची शक्यता
- रिफर्बिश्ड फोनची मागणी वाढण्याचा अंदाज