आंदोलनाला शेतकरी वर्गातून प्रतिसाद मिळत असून, आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आली आहे.
कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू; बीपी आणि शुगर घटल्याने डॉक्टरांचा सलाईनचा सल्ला, मात्र रोहित पवारांचा नकार
सोलापूर (Hunger Strike) : शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तीं शिवाय कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला शेतकरी वर्गातून प्रतिसाद मिळत असून, आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या दोन दिवसांत रोहित पवार यांनी अन्नासोबतच पाणीही घेतले नव्हते. त्यामुळे शनिवारी रात्री त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्यांना पाणी आणि ओआरएस घेण्याचा सल्ला दिला. पवार यांनी पाणी घेतले असले तरी ओआरएस घेण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. परिणामी त्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होत असल्याची माहिती मिळत आहे.
प्रकृती खालावत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांचे संपूर्ण कुटुंब पंढरपुरातील आंदोलनस्थळी दाखल झाले. यामध्ये त्यांची आई, बहीण, पत्नी तसेच दोन्ही मुलांचा समावेश होता. कुटुंबीयांना पाहून वातावरण भावनिक झाले. दरम्यान, रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे मागील दोन दिवसांपासून आंदोलनस्थळी उपस्थित असून, मंचावर नसले तरी ते आंदोलनात सहभागी असल्याचे सांगितले जात आहे.
या आंदोलनाला विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांवरून पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस पक्षानेही रोहित पवार यांच्या मागणीला समर्थन दिले आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलनस्थळी भेट देणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, रोहित पवार यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी लक्षात घेऊन डॉक्टरांनी सलाईन लावण्याची सूचना केली होती. मात्र, पवार यांनी सलाईन घेण्यास नकार दिला आहे.
राज्य सरकारमधील संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन हे रोहित पवार यांची भेट घेण्यासाठी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर ते पवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सलाईन लावण्याबाबत निर्णय घेऊ, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भेटीत सरकार आणि रोहित पवार यांच्यात काही तोडगा निघतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.