Jintur Police Crime: परभणीत येलदरी कॅम्प येथे किरकोळ वादातून एक व्यक्तीचा मृत्यू झाला. जिंतूर पोलीसात तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. घटनेत अरविंद रणखांब यांच्यावर हल्ला झाला.
येलदरी कॅम्प येथील घटना उपचारा दरम्यान मृत्यू...!
जिंतूर (Jintur Police Crime) : तालुक्यातील येलदरी कॅम्प येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद उर्फ आरुण नारायण रणखांब (वय ४५, रा. येलदरी कॅम्प ता. जिंतूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेप्रकरणी त्यांची मुलगी स्नेहा अरविंद रणखांब (वय १९) हिने फिर्याद दिली आहे. गुरुवार ९ एप्रिल रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर ही घटना घडली. आरोपी रुपेश उर्फ अजय अशोक वाकळे, दिपक वाके व हैदर पठाण (सर्व रा. येलदरी कॅम्प) यांनी संगनमत करून अरविंद रणखांब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
दारू पिण्यासाठी ५० रुपये मागितल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यावेळी आरोपी रुपेश वाकळे याने लोखंडी रॉडने डोक्यावर व तोंडावर वार करून गंभीर जखमी केले, तर इतर दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. जखमी अवस्थेत असलेल्या रणखांब यांना आरोपींनीच जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले व अपघात झाल्याची खोटी माहिती दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र उपचारादरम्यान बुधवार १५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल करत आहेत.
मदत करणार्यांनाही सहआरोपी केल्याने संताप
येलदरी कॅम्प येथे गुरुवार ९ एप्रिल रोजी झालेल्या या (Jintur Police Crime) घटनेत गंभीर जखमी असलेल्या रणखांब यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणार्यांना सहआरोपी करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळताच गावात संतापाची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जि.प. अध्यक्षा यांचे पती विजय वाकळे, सरपंच पिंटू चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत जिंतूर पोलीस ठाण्यात गर्दी केली. यावेळी सरपंच पिंटू चव्हाण यांनी, ‘मदत करणार्यांना सहआरोपी करणे चुकीचे असून यामुळे भविष्यात कोणीही माणुसकीच्या भावनेतून मदत करणार नाही. पोलीसांनी सखोल चौकशी करून न्याय द्यावा,’ अशी मागणी केली.