पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान घडलेल्या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाने अनपेक्षित वळण घेतले आहे.
लोणावळा (Ketan Agarwal) : पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान घडलेल्या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाने अनपेक्षित वळण घेतले आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात असताना, लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा प्रकार पूर्वनियोजित हत्येचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मृत तरुणाची होणारी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
मृत तरुणाचे नाव केतन विशाल अग्रवाल (वय २४) असे असून, तो पुण्यातील उद्योजक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. गुरुवारी (१८ जून) केतन हा आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेला होता. दोघे किल्ल्यावर फिरत असताना दरीच्या काठावर फोटो काढण्याच्या वेळी केतनचा तोल जाऊन तो दरीत पडल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते.
मात्र, घटनेचा सखोल तपास, तांत्रिक विश्लेषण आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांना हा अपघात नसल्याचा संशय आला. तपासात केतनला दरीत ढकलण्यात आल्याची बाब समोर आली असून, त्यामागे त्याची मंगेतर सिया गोयल आणि तिच्या एका पुरुष मित्राचा कट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.
घटनेनंतर केतन दरीत कोसळल्याचे पाहून त्याच्या होणाऱ्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा केला. यानंतर घटनास्थळी उपस्थित पर्यटकांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि मावळ वन्यजीव पथकाला घटनास्थळी पाचारण केले. बचाव पथकाने दरीत उतरून केतनला बाहेर काढले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला असून, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिला केतन अग्रवाल यांच्याशी विवाह करायचा नव्हता. त्यामुळे तिने आपल्या एका मित्राच्या मदतीने केतनला वाटेतून हटविण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. नियोजनानुसार वाढदिवसाच्या निमित्ताने लोहगड किल्ल्यावर ट्रेक आयोजित करण्यात आला आणि योग्य संधी साधून केतनला खोल दरीत ढकलल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, केतन आणि सिया यांचा विवाह येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार होता. विवाहासाठी राजस्थानमधील जयपूर येथे सुमारे १७ कोटी रुपये खर्च करून एक आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता. तसेच पाहुण्यांच्या प्रवासासाठी दोन विशेष चार्टर्ड विमानांचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला असून, होणाऱ्या पत्नीसह तिच्या कथित प्रियकराची चौकशी सुरू आहे. तसेच या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास केला जात आहे.