चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड १३ जून रोजी होणार असून, नव्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अविरोध निवडीची शक्यता, मात्र इच्छुकांमध्ये रस्सीखेच कायम
चिखली (Chikhli Bazar Samiti ) : बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड १३ जून रोजी होणार असून, नव्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवड अविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी इच्छुकांमधील अंतर्गत रस्सीखेच कायम असल्याचे चित्र आहे. माजी सभापती डॉ. संतोष वानखेडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांची संख्या लक्षात घेता पक्ष नेतृत्वासमोर योग्य उमेदवार निवडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
सभापतीपदासाठी संचालकांची मते जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर यांना चिखली येथे पाठविण्यात आले होते. त्यांनी सर्व संचालकांशी चर्चा करून आपला सविस्तर अहवाल वरिष्ठ नेतृत्वाकडे सादर केला आहे. दैनिक देशोन्नतीशी बोलताना उमाळकर म्हणाले की, संचालक मंडळातील विविध गटांनी आपापली मते मांडली असून डॉ. राजेंद्र शिंगणे, राहुल बोंद्रे आणि प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या समर्थकांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेणार असून इच्छुकांपैकी एकाची सभापतीपदी अविरोध निवड होणार आहे.
दरम्यान, सभापतीपद काँग्रेसकडे राहणार हे जवळपास निश्चित मानले जात असले तरी इच्छुकांची संख्या आणि त्यांचे राजकीय वजन लक्षात घेता अंतिम निवड सोपी नसल्याचे बोलले जात आहे. (Chikhli Bazar Samiti) सामाजिक समतोल, पक्षनिष्ठा आणि स्थानिक राजकीय समीकरणे यांचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार असल्याने नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. यापूर्वी उपसभापती निवडीवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात नाराजी निर्माण झाली होती. त्या निवडीत एका इच्छुकाला संधी मिळाल्यानंतर दुसऱ्या इच्छुकाने नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकला होता. त्यामुळे यावेळीही इच्छुकांपैकी कोणाला संधी मिळते आणि कोण नाराज होते, याकडे लक्ष लागले आहे.
सध्या पाच ते सहा इच्छुकांनी सभापतीपदासाठी दावा केला असून काहींनी तर जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवड अविरोध झाली तरी अंतर्गत राजकीय हालचाली थांबलेल्या नाहीत. १३ जून रोजी सभापतीपदाची निवड झाल्यानंतरच महाविकास आघाडीचा किल्ला अधिक मजबूत होणार की नाराजीचे सूर उमटणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.