Breaking News
  • आजपासून संपूर्ण देशात ''VB-G RAM G'' कायदा लागू
  • १० वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५ हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन; शासनाचा मोठा निर्णय
  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये भडकला हिंसाचार; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू...
  • व्हेनेझुएलात भारतीय खलाशाचा संशयास्पद मृत्यू; पुनःशवविच्छेदनात २१ अवयव गायब असल्याचा दावा
  • RCB ची मालकी बदलली; 16,660 कोटींच्या व्यवहाराला CCI ची मंजुरी
  • दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! बस जळून खाक; 7 प्रवाशांचा मृत्यू, 22 जखमी
  • मुंबईसह ठाण्यात पुढील काही तास अतिवृष्टीचा इशारा; हवामान खात्याचा रेड अलर्ट
  • लोहगडावर चेतन चौधरीकडून गुन्ह्याचे रिक्रिएशन; सिया-चेतन ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत
  • शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; महापालिकेवर सुधीर मुनगंटीवार यांचा संताप

होम > देश

Venezuela Ship Death

व्हेनेझुएलात भारतीय खलाशाचा संशयास्पद मृत्यू; पुनःशवविच्छेदनात २१ अवयव गायब असल्याचा दावा

व्हेनेझुएलामध्ये ड्युटीदरम्यान मृत्यू झालेल्या भारतीय खलाशी राकेश चौहान (वय ३३) यांच्या मृत्यूभोवतीचे गूढ अधिकच गडद झाले आहे.


व्हेनेझुएलात भारतीय खलाशाचा संशयास्पद मृत्यू पुनःशवविच्छेदनात २१ अवयव गायब असल्याचा दावा

Venezuela Ship Death |

राकेश चौहान प्रकरणाने खळबळ; FSUI कडून चौकशीची मागणी, कुटुंबीयांनी हत्या आणि अवयव तस्करीचा संशय व्यक्त केला

लखनऊ (Venezuela Ship Death) : व्हेनेझुएलामध्ये ड्युटीदरम्यान मृत्यू झालेल्या भारतीय खलाशी राकेश चौहान (वय ३३) यांच्या मृत्यूभोवतीचे गूढ अधिकच गडद झाले आहे. भारतात पार्थिव आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या पुनःशवविच्छेदनात किडनी, हृदय, फुफ्फुसांसह तब्बल २१ महत्त्वाचे अंतर्गत अवयव गायब असल्याचा दावा समोर आला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांनी गंभीर संशय व्यक्त केला असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.

राकेश चौहान हे मूळचे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी असून पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा, वडील आणि भावासह मुंबईत वास्तव्यास होते. त्यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये मर्चंट नेव्हीमध्ये मरीन फिटर म्हणून काम सुरू केले होते आणि त्यांची नियुक्ती व्हेनेझुएलामध्ये झाली होती.

७ मे रोजी राकेश यांच्या वडिलांना रामदेव चौहान यांना कंपनीकडून फोन करून जहाजावर पडल्यामुळे राकेश जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून वाचण्याची शक्यता केवळ पाच टक्के असल्याचे सांगण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी कंपनीने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, चक्कर आल्याने ते जहाजावर पडले, गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर राकेश यांची पत्नी रंजना चौहान आणि वडील मुंबईस्थित शिपिंग कंपनीच्या कार्यालयात गेले. त्यावेळी आठवडाभरात पार्थिव भारतात पाठवले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, जवळपास महिन्यानंतर ४ जून रोजी राकेश यांचे पार्थिव देवरिया येथे पोहोचले. मृत्यूचे नेमके कारण किंवा व्हेनेझुएलामध्ये करण्यात आलेल्या शवविच्छेदनाचा कोणताही अधिकृत अहवाल कंपनीने कुटुंबीयांना दिला नसल्याचा आरोप आहे.

देवरियात सुरुवातीला डॉक्टरांनी आधीच शवविच्छेदन झाल्याचे कारण देत पुनःशवविच्छेदनास नकार दिला. मात्र जिल्हाधिकारी मधुसूदन हुलगी यांच्या आदेशानंतर पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी किडनी, हृदय, फुफ्फुसांसह एकूण २१ अवयव शरीरात नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला. तसेच व्हिसेरा तपासासाठी आवश्यक अवयवही उपलब्ध नसल्याने मृत्यूचे अचूक कारण निश्चित करणे डॉक्टरांसाठी शक्य झाले नाही.

या प्रकरणानंतर फेडरेशन ऑफ सीफेअरर्स युनियन्स ऑफ इंडिया (FSUI) नेही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हेनेझुएलामधील अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनाचा अहवाल न देता आणि कोणतीही अधिकृत माहिती न देता पार्थिव भारतात कसे पाठवले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

FSUI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. कुटुंबीयांची परवानगी न घेता शरीरातील महत्त्वाचे अवयव का काढण्यात आले? पुनःशवविच्छेदनाची मागणी होईपर्यंत कुटुंबीयांना माहितीपासून दूर का ठेवण्यात आले? मृतदेह स्वीकाराच्या पावतीवर 'रंजना चौरेसिया'ऐवजी 'अंजना चौरेसिया' अशी स्वाक्षरी का करण्यात आली? तसेच रोजगार करारातील जहाजाचे नाव आणि प्रत्यक्ष नियुक्ती झालेल्या जहाजाचे नाव वेगळे का आहे? असे प्रश्न संघटनेने उपस्थित केले आहेत.

दरम्यान, राकेश यांचे सहकारी घनश्याम सिंह आणि कुटुंबीयांनी विमा रकमेचा लाभ मिळवण्यासाठी तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप केला आहे. राकेश यांची हत्या करून त्यांच्या अवयवांची तस्करी करण्यात आल्याचा संशयही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी आणि व्हेनेझुएलामधील भारतीय दूतावासाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी कुटुंबीयांसह FSUI ने केली आहे.

Related to this topic: