मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलत्या सामाजिक आणि शैक्षणिक वातावरणावर भाष्य करत विद्यार्थी संघटनांनी नव्या पिढीच्या अपेक्षा ओळखण्याची गरज अधोरेखित केली.
मनविसे मेळाव्यात चंद्रकांत पाटलांवर खोचक टिप्पणी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत भाजपच्या ट्रोल संस्कृतीवरही साधला निशाणा
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) मुंबईतील मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलत्या सामाजिक आणि शैक्षणिक वातावरणावर भाष्य करत विद्यार्थी संघटनांनी नव्या पिढीच्या अपेक्षा ओळखण्याची गरज अधोरेखित केली. याच वेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका करत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील वक्तव्याचा संदर्भ देत भाजपच्या ट्रोल संस्कृतीवरही टीका केली.
राज ठाकरे म्हणाले की, त्यांनी सार्वजनिक जीवनात काम करण्यास सुरुवात केली तेव्हाचा काळ आणि सध्याची परिस्थिती यामध्ये मोठा फरक आहे. त्या काळातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांची विचारसरणी आणि आजच्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्णपणे बदलल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या 'जेन झी' पिढीला समजून घेणे आणि त्यांच्या गरजांनुसार संवाद साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी मनविसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, 'जेन झी' म्हणजे केवळ मुंबई, पुणे किंवा दिल्लीतील इंग्रजी बोलणारी तरुणाई नव्हे. १९९७ नंतर जन्मलेली ग्रामीण भागातील युवक-युवतीही त्याच पिढीचा भाग आहेत. त्यांच्या अपेक्षा, विचार करण्याची पद्धत आणि भविष्याबाबतचा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे. जुन्या संकल्पना सोडून काळानुरूप बदल स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर राज ठाकरे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. "एका व्यक्तीने आयुष्यभर केसांना तेल चोपडलं, पण बुद्धी आली नाही. आणि हे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. मला चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स पाहायचे आहेत," असा टोला त्यांनी लगावला.
भाषणादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील वक्तव्याचाही उल्लेख केला. राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांनी काही व्हिडिओ आणि त्यामधील भाषेवर आक्षेप घेत तो प्रकार अयोग्य असल्याचे म्हटले आहे, त्याच्याशी आपण सहमत आहोत. मात्र, अशीच भूमिका भाजपमधील कार्यकर्ते आणि नेत्यांनाही लागू व्हावी, असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी गेल्या १२ वर्षांत भाजपच्या ट्रोल टीममुळे सार्वजनिक चर्चेची पातळी घसरल्याचा आरोप केला. "तुम्ही जे पेराल, तेच उगवतं," असे म्हणत त्यांनी या संस्कृतीमुळेच आजची परिस्थिती निर्माण झाल्याची टीका केली.
राज ठाकरे यांनी पुढे असेही म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित मुलांना माफ केल्याचे सांगितले आहे. मात्र, गेल्या १२ वर्षांत भाजपच्या लोकांनी केलेल्या कृत्यांसाठी माफी कोण मागणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या खेळाडूंवर झालेल्या कारवाईचाही उल्लेख करत त्याबाबतही त्यांनी सरकारला प्रश्न विचारले.