श्रीलंकेतील पश्चिम किनारपट्टीवरील नेगोम्बो शहरातील मुख्य कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये उसळलेल्या भीषण हिंसाचारात मृतांचा आकडा 25 वर पोहोचला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
ड्रग्स तस्करीच्या वादातून उसळला संघर्ष; तुरुंगात गोळीबार, धारदार शस्त्रांनी हल्ले, विशेष चौकशीचे आदेश
श्रीलंकेतील पश्चिम किनारपट्टीवरील नेगोम्बो शहरातील मुख्य कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये उसळलेल्या भीषण हिंसाचारात मृतांचा आकडा 25 वर पोहोचला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कारागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, गेल्या पाच वर्षांतील देशातील सर्वात भीषण तुरुंगातील हिंसक घटना म्हणून तिची नोंद होत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (5 जुलै 2026) संध्याकाळी अतिगर्दी असलेल्या नेगोम्बो कारागृहात दोन प्रतिस्पर्धी कैदी गटांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली. प्राथमिक तपासात, कारागृहातील ड्रग्स तस्करीला पाठिंबा देणाऱ्या गटाचा आणि त्याला विरोध करणाऱ्या गटाचा वाद हिंसक स्वरूप धारण केल्याचे समोर आले आहे.
रविवार रात्री सुरू झालेला संघर्ष सोमवारी (6 जुलै 2026) पुन्हा भडकला. दंगेखोर कैद्यांनी तुरुंगातील बंदुका ताब्यात घेतल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली. या हिंसाचारादरम्यान गोळीबारही झाला असून अनेकांना गोळ्या लागल्या आहेत. तसेच धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक कैदी आणि सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले.
नेगोम्बो सरकारी रुग्णालयाच्या संचालिका पुष्पा गमलाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 25 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले असून 100 हून अधिक जखमी कैदी आणि सुरक्षा रक्षकांवर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना वाचवण्यासाठी वैद्यकीय पथकाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी सकाळपर्यंतही कारागृह परिसरातून अधूनमधून गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते. हिंसाचाराची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स (STF) आणि दंगल नियंत्रण पथकांना तातडीने घटनास्थळी तैनात करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
गोंधळादरम्यान महिला विभागातील काही कैद्यांनीही सुटकेच्या मागणीसाठी बराकीच्या छतावर चढत आंदोलन केले. त्यावेळी छताचा काही भाग कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकून काही महिला कैदी जखमी झाल्या.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सोमवारी तीन कैद्यांना पल्लान्सेना तुरुंग छावणीत हलविण्यात आले आहे. दरम्यान, कारागृह विभागाचे माध्यम प्रवक्ते ए.सी. गजानायके यांनी या संपूर्ण घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली. कारागृह आयुक्तांच्या निर्देशानुसार हिंसाचाराची कारणे आणि संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी केली जाणार आहे.
याशिवाय, पोलिसांकडून स्वतंत्र तपास सुरू असून न्यायमंत्री ॲडव्होकेट हर्षणा नानायक्कारा यांनीही या घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी 5 जुलै रोजी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्राथमिक न्यायालयीन चौकशीही पार पडली आहे.