दिल्लीत NEET परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या घटनेवरून राजकीय प्रतिक्रिया अधिक तीव्र होत आहेत.
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईवर विरोधी पक्षनेत्यांचा हल्लाबोल; शिक्षण व्यवस्थेवरही उपस्थित केले गंभीर प्रश्न
नवी दिल्ली : दिल्लीत NEET परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या घटनेवरून राजकीय प्रतिक्रिया अधिक तीव्र होत आहेत. या प्रकरणावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, विद्यार्थ्यांवरील कारवाईला दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी सोमवारी झालेल्या पोलिस कारवाईवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, शांततेने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर लाठीमार करणे हा भारतीय संस्कारांचा भाग नाही. लोकशाही पद्धतीने आपली भूमिका मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे कारवाई होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रणाली गंभीर संकटातून जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या मते, शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळेच तरुणांना आपल्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. अशा परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी या महत्त्वाच्या विषयावर मौन बाळगत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, दिल्लीतील लाठीचार्जच्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची थेट माफी मागावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.