NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाने आता नवे राजकीय स्वरूप धारण केले आहे.
नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाने आता नवे राजकीय स्वरूप धारण केले आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जनंतर अनेक आंदोलक जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेनंतर विविध विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आंदोलनाला उघड पाठिंबा जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बुधवारी जंतर-मंतरवर दाखल झाले. त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेऊन आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका करत आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, शांततापूर्ण आंदोलनाची ताकद देशाने यापूर्वीही पाहिली आहे आणि त्याच मार्गाने न्याय मिळू शकतो. विद्यार्थ्यांनी आंदोलनाची जागा सोडू नये, कारण जंतर-मंतर हे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी निश्चित करण्यात आलेले ठिकाण आहे, असे त्यांनी सांगितले. ज्यांना जनतेने आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी मतदान करून सत्तेत पाठवले, तेच आज विद्यार्थ्यांविरोधात उभे राहत असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी सरकारला थेट इशारा देत सांगितले की, पुढील काळात आंदोलनकर्त्यांवर पुन्हा लाठीचार्ज किंवा अन्य प्रकारची कारवाई झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहील. "जर पुन्हा लाठीचार्ज झाला, तर महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही," असा इशारा त्यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या भावना आणि संघर्षाचा आदर राखला गेला पाहिजे, तसेच कोणत्याही निर्णयामुळे त्यांच्या न्यायाच्या लढ्याला धक्का बसू नये, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विविध विरोधी पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. मंगळवारी राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अमित ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
विरोधकांनी सरकार आणि पोलिसांवर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे.