संसदेच्या पावसाळी अधिवेशनात परीक्षा सुधारणा विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान लोकसभेत बुधवारी तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.
परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान गृहमंत्र्यांवर थेट आरोप; किरेन रिजिजूंची माफीची मागणी, विरोधकांकडून घोषणाबाजी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात परीक्षा सुधारणा विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान लोकसभेत बुधवारी तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आणि अखेर गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर दुपारी २.३० वाजता कामकाज पुन्हा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
राहुल गांधी यांनी भाषणात दावा केला की, गृहमंत्री अमित शाह सभागृहात येण्याचे टाळत असून देशातील विद्यार्थ्यांवर झालेल्या गोळीबार आणि पेलेट गनच्या कारवाईसाठी तेच जबाबदार आहेत. या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला.
परीक्षा व्यवस्थेवर बोलताना राहुल गांधी यांनी पेपर तयार करण्यापासून ते मूल्यमापनापर्यंतची संपूर्ण यंत्रणा बिघडल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षा प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाऐवजी पैशांची उकळपट्टी करण्याचे साधन बनली आहे. ₹30 ते ₹40 लाखांमध्ये प्रश्नपत्रिका फुटत असल्याचा आरोप त्यांनी करत, त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे सांगितले. परीक्षा प्रक्रियेचे काम खासगी कंपन्यांकडे दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला.
यावेळी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शिक्षण व्यवस्थेवर प्रभाव टाकत असल्याचा आरोप करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे केवळ नावापुरते मंत्री असल्याचे वक्तव्य केले.
राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले. गृहमंत्र्यांनी गोळीबाराचे आदेश दिल्याचा दावा कोणत्या पुराव्यावर आधारित आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच राहुल गांधी यांनी आपल्या आरोपांना आधार देणारे शासकीय आदेश किंवा अधिकृत कागदपत्र सभागृहात सादर करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
रिजिजू यांनी पुढे इशारा दिला की, पुरावे सादर करता येत नसतील तर राहुल गांधी यांनी सभागृहाची माफी मागावी. कोणताही खासदार कोणावरही आधाराशिवाय गंभीर आरोप करू शकत नाही, असे सांगत त्यांनी माफीशिवाय सभागृहाचे कामकाज पुढे चालू देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
या वक्तव्यांनंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी "गृहमंत्री उत्तर द्या" अशा घोषणा देत सभागृहात गदारोळ केला. सत्ताधारी पक्षाकडून राहुल गांधी यांच्या माफीची मागणी करण्यात आली, तर विरोधकांनी गृहमंत्र्यांकडून स्पष्टीकरण देण्याची मागणी लावून धरली. परिणामी लोकसभेतील वातावरण तणावपूर्ण बनले आणि काही काळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, देशातील तरुण आणि विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या आंदोलनामागे राग किंवा द्वेष नसून शिक्षण व्यवस्थेबाबतच्या भावना आहेत. विद्यार्थ्यांचा संताप योग्य असल्याचे सांगत त्यांनी तरुणांचा सन्मान केला गेला पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच भाजपच्या नेत्यांनी आपल्या मुलांशी संवाद साधल्यास त्यांनाही या आंदोलनामागील भावना समजतील, असा टोला त्यांनी लगावला.