विविध मागण्यांसाठी सुरू असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण अखेर २६ दिवसांनंतर संपले.
जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता; पेपर लीकविरोधी विधेयक आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल न करण्याचे सरकारचे आश्वासन
नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील जबाबदारी निश्चित करणे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण अखेर २६ दिवसांनंतर संपले. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले. या क्षणाचा व्हिडिओही समोर आला आहे.
उपोषण समाप्त करताना वांगचुक यांच्यासोबत त्यांच्या पत्नी गीतांजलीही उपस्थित होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी सरकारच्या वतीने एक पत्र वाचून दाखवत काही महत्त्वाची आश्वासने जाहीर केली.
सरकारने दिलेल्या आश्वासनांनुसार, संसदेकडे काढण्यात आलेल्या मोर्चात तसेच जंतरमंतरवरील शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही आंदोलकाविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. याशिवाय, संसदेत पेपर लीक प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांवर सविस्तर चर्चा केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
तसेच, नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुढील दिनक्रम ठरवावा आणि लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केल्याचे मोदी यांनी म्हटले.
यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून रात्री उशिरा व्हिडिओ संदेश दिला होता. पेपर लीक रोखण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाईची तरतूद असलेले विधेयक लवकरच संसदेत सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर चर्चा होणार असून ते संसदेत मंजूर करून घेण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.