भारत-अमेरिका प्रस्तावित मुक्त व्यापार कराराला (India-US Trade Deal) विरोध करण्यासाठी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी शेतकरी आंदोलनावर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
'देश बचाओ मोर्चा'च्या आंदोलनावर पोलिसांची मोठी कारवाई; किसान घाट, राजघाट आणि दिल्ली सीमांवर कडेकोट बंदोबस्त, ५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची धरपकड
भारत-अमेरिका प्रस्तावित मुक्त व्यापार कराराला (India-US Trade Deal) विरोध करण्यासाठी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी शेतकरी आंदोलनावर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 'देश बचाओ मोर्चा'च्या नेतृत्वाखाली किसान घाट येथे आंदोलनासाठी येणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना विविध ठिकाणी अडवून ताब्यात घेण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर आणि राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते सरदार व्ही. एम. सिंह यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांवरही पोलिसांनी कारवाई केली.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह विविध राज्यांतून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले होते. मात्र, आंदोलन रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी रात्रीपासूनच व्यापक नाकेबंदी केली. राजघाट आणि किसान घाट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आतापर्यंत सुमारे ५,००० हून अधिक शेतकऱ्यांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेऊन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीत पोहोचल्यानंतर राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनाही किसान घाट परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी शेतकरी नेते आणि पोलिसांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, हरियाणा पोलिसांनी पंजाब-हरियाणा दरम्यानच्या शंभू आणि खनौरी या प्रमुख सीमांवर संपूर्ण नाकेबंदी केली असून, अंबाला परिसरात कलम १६३ लागू करण्यात आले आहे.
या कारवाईचा निषेध करताना राजू शेट्टी यांनी आरोप केला की, एपस्टीन फाईल्सच्या दबावामुळे केंद्र सरकार भारत-अमेरिका व्यापार कराराच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहोचवत आहे. अमेरिकेतील कॉर्पोरेट शेतीला मोठ्या प्रमाणावर सरकारी अनुदान मिळत असल्याने हा करार झाल्यास स्वस्त कृषी आणि दुग्धजन्य उत्पादने भारतीय बाजारपेठेत दाखल होतील. त्याचा फटका भारतातील लहान शेतकरी, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसेल, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, केंद्र सरकार कितीही दडपशाही करत असले तरी शेतकरी आपल्या हक्कांसाठीचा लढा थांबवणार नाहीत, असा इशारा शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीने दिला आहे. दिल्लीपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावरील पानिपत परिसरातील राजीव गांधी स्टेडियम तसेच जवळील पोलीस ठाण्यांमध्ये अनेक आंदोलकांना ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची तातडीने सुटका न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.