राजधानी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा प्रभाव आता देशभर उमटू लागला.
जंतर-मंतरवरील लाठीचार्जनंतर विरोधक आक्रमक; विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विविध पक्ष आणि संघटनांची भूमिका तीव्र
राजधानी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा प्रभाव आता देशभर उमटू लागला असून या आंदोलनाला विविध विरोधी राजकीय पक्षांकडून उघड पाठिंबा मिळताना दिसत आहे. जंतर-मंतर परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते आंदोलनस्थळी दाखल होत असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्या दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची घोषणा केली आहे.
जंतर-मंतर आणि संसद परिसरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या घटनेचा निषेध नोंदवत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समविचारी राजकीय पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांना २३ जुलै रोजी होणाऱ्या 'महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी होण्याचे आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीतील आंदोलनातील घडामोडींनंतर महाराष्ट्रातही या मुद्द्यावर वातावरण तापू लागल्याचे चित्र दिसत आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भारतीय नागरिकांवरच सरकारने कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी शेतकरी आंदोलनालाही सरकारने विविध विशेषणांनी लक्ष्य केल्याचा उल्लेख करत, शेतकऱ्यांना 'अर्बन नक्षली' असे संबोधण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, दिल्लीतील आंदोलनाला महाराष्ट्रातील विविध भागांतूनही समर्थन व्यक्त केले जात आहे. अहिल्यानगरमध्ये आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. रिमझिम पावसातही आंदोलन सुरू ठेवत कार्यकर्त्यांनी 'मोदी हटाव देश बचाव', 'हम क्या चाहते आझादी' आणि 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.