पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातील अलिपूर परिसरात असलेल्या एका सरकारी इमारतीला बुधवारी भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.
कोलकाता (4000 EVM Destroyed) : पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातील अलिपूर परिसरात असलेल्या एका सरकारी इमारतीला बुधवारी भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या आगीत सुमारे 4000 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.राज्याचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा मंत्री कौशिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले की, ही घटना अत्यंत गंभीर असून मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच प्रशासकीय नुकसान झाले आहे. त्यांच्या माहितीनुसार, या ईव्हीएमचा वापर राज्यातील अलीकडील निवडणुकांदरम्यान 10 मतदारसंघांमध्ये करण्यात आला होता.
मंत्र्यांनी स्पष्ट केले की, आग नेमकी कशामुळे लागली याचा अद्याप खुलासा झालेला नाही. “ही आग सामान्य दुर्घटना वाटत नाही. काहीतरी संशयास्पद असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच अधिक स्पष्टता मिळेल, असेही नमूद केले.अधिकाऱ्यांच्या प्राथमिक माहितीनुसार, आग सर्वप्रथम इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आढळून आली होती. त्यानंतर ती वेगाने पसरत सातव्या आणि आठव्या मजल्यापर्यंत पोहोचली. मात्र चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यांवर आग कशी पोहोचली नाही, याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

घटनेनंतर तब्बल 24 तासांहून अधिक काळ उलटूनही अग्निशमन दलाचे जवान सतत आग विझवण्याचे आणि ‘कूलिंग ऑपरेशन’ सुरू ठेवण्याचे काम करत होते . इमारतीच्या काही भागांत अजूनही धगधगती आग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत सील करण्यात आली असून कोणालाही प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि परिसरात कडक निगराणी ठेवली जात आहे.
दक्षिण 24 परगणा जिल्हा प्रशासनाने अलीपुर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
तपास यंत्रणा आता या गोष्टीचा शोध घेत आहेत की आग ही वीजेतील बिघाडामुळे लागली की ती जाणूनबुजून घडवून आणलेली घटना होती. फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचून नमुने गोळा करणार असून त्यांच्या अहवालानंतरच आग लागण्यामागचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून परस्पर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार यांनी घातपाताच्या शक्यतेवर गंभीर शंका व्यक्त केली असून, भाजप नेते राकेश सिंह यांनी ही घटना पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे. मात्र या दाव्यांना अद्याप ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.