Rajmata Women Entrepreneur Hall: गाळे बंदच राहिल्याने कोटींचा खर्च वाया गेला. महिलांना रोजगार आणि व्यवसायाची संधी उपलब्ध नाहीत. जिल्हाध्यक्षने तातडीने वापर सुरू करण्याची मागणी.
राजमाता महिला उद्योजक दालन धुळखात; मनसेचे गणेश बरबडे यांची वापर सुरू करण्याची मागणी
चिखली (Rajmata Women Entrepreneur Hall) : तत्कालीन खासदार तथा विद्यमान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने उभारण्यात आलेले “राजमाता महिला उद्योजक वस्तू दालन” चिखलीत अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले आणि लाखमोलाच्या शासकीय जागेवर उभे असलेले आठ सुसज्ज गाळे सध्या धुळखात पडले असून, या प्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी संबंधित गाळ्यांचा तातडीने वापर सुरू करावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
महिला उद्योजकांना (Rajmata Women Entrepreneur Hall) स्वतःच्या उत्पादनांसाठी विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, महिला बचत गटांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात विविध ठिकाणी “राजमाता महिला उद्योजक वस्तू दालन” उभारण्यात आले. त्याच धर्तीवर चिखली येथे राऊतवाडी ते तहसील कार्यालय मार्गादरम्यान पंचायत समितीच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर आठ सुसज्ज गाळे कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहेत.विशेष म्हणजे हे गाळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या परिसरात आहेत.
परिसरात तहसील कार्यालय, न्यायालय, भूमिअभिलेख विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कृषी विभाग तसेच पंचायत समितीची विविध कार्यालये असल्याने येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मुख्य रस्त्याच्या फ्रंटवर उभारलेले हे गाळे महिला उद्योजिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षा होती. मात्र अनेक महिन्यांपासून हे गाळे बंदच असल्याने शासनाचा खर्च आणि मौल्यवान जागा दोन्ही वाया जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. ज्या संकल्पनेतून हे (Rajmata Women Entrepreneur Hall) दालन उभारण्यात आले, ती प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवण्यात शासकीय यंत्रणा कमी पडली की महिला बचत गटांचा प्रतिसाद कमी मिळाला, हा संशोधनाचा विषय असला तरी सध्या हे गाळे निष्क्रिय अवस्थेत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यासंदर्भात मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी २९ मे २०२६ रोजी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी समाधान वाघ यांची भेट घेऊन गाळे त्वरित सुरू करण्याची मागणी केली. तसेच अनेक होतकरू युवक, महिला बचत गट आणि गरजू नागरिकांना येथे व्यवसायाची संधी उपलब्ध करून देता येऊ शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांच्यासोबत राजेश परिहार ,शैलेश कापसे, प्रदीप भवर सह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, संवर्ग विकास अधिकारी समाधान वाघ यांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता हे गाळे महिला आर्थिक विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे आता महिला आर्थिक विकास विभाग या गाळ्यांबाबत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या (Rajmata Women Entrepreneur Hall) प्रकल्पाचा प्रत्यक्ष लाभ महिलांना आणि स्थानिक उद्योजकांना कधी मिळणार, हा प्रश्न सध्या नागरिकांमध्ये उपस्थित होत असून प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.