भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात दि. ३० जुलै वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टीची शक्यता वर्तविल्याने जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन; अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, नदी-नाल्यांपासून दूर राहण्याच्या सूचना
परभणी : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३० जुलै) वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टीची शक्यता वर्तविल्याने जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे व प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळावे. नदी, नाले, ओढे, पूल, बंधारे तसेच सखल आणि पूरप्रवण भागात जाणे धोकादायक ठरू शकते. तसेच पाण्याचा प्रवाह असलेल्या रस्त्यांवरून किंवा पुलांवरून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली, विद्युत खांबाजवळ किंवा मोकळ्या जागेत थांबू नये. जिल्ह्यातील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन परभणी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.