राज्यातील अनेक भागांसह मुंबई महानगर प्रदेशात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे.
रत्नागिरीतही रेड अलर्ट; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट, सखल भाग जलमय
मुंबई (Weather Alert) : राज्यातील अनेक भागांसह मुंबई महानगर प्रदेशात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई परिसरात पावसाच्या संततधार सुरू असून, हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी गंभीर इशारा जारी केला आहे. मुंबई आणि ठाण्यातील काही भागांमध्ये पुढील २४ तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, मुंबईसाठी तीन तासांचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत रेड अलर्ट लागू राहणार असून या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मुंबईत उर्वरित काळासाठी ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, पुढील ७२ तासांत कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट परिसरातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील वाहतुकीवरही झाला आहे. गोरेगाव फिल्म सिटी रोडवरील संतोष नगर परिसरात दोन ते तीन फूट पाणी साचल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शाळेच्या वेळेतच रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढत शाळेत जावे लागत आहे.
मालाड सबवेमध्ये सुमारे एक फूट पाणी साचल्यामुळे मालाड पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. याशिवाय, सबवेबाहेरील मुख्य नाल्याचे लोखंडी झाकण तुटल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
ठाणे शहरातही मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. मुख्य बाजारपेठ, वंदना डेपो, मासुंदा तलाव आणि कोपरी बारा बंगला परिसरात पाणी साचले असून, महापौर शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह या भागांची पाहणी केली.
दरम्यान, पालघर जिल्ह्यात मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही सखल भागांमध्ये पाणी साचले असून, रानशेत आणि दाभोण परिसरातून वाहणाऱ्या सुसरी नदीला मोठा पूर आला आहे. समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून खरीप हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरत असल्याचे चित्र आहे.