पावसाळ्यात धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी खोपोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
ठाण्यातील अभिषेक कुशवाह याचा सेल्फी काढताना पाय घसरला; रात्रभर शोधमोहीम राबवल्यानंतर पहाटे मृतदेह बाहेर
पावसाळ्यात धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी खोपोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध केपी वॉटरफॉल परिसरात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात ठाणे येथील २३ वर्षीय अभिषेक कुशवाह याचा सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. रात्रभर सुरू असलेल्या बचाव आणि शोधमोहीमेनंतर सोमवारी पहाटे त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
सेल्फी काढताना घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ठाण्यातील चार मित्र पर्यटनासाठी खोपोलीजवळील केपी वॉटरफॉल येथे गेले होते. धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर ते परतीच्या मार्गाने निघाले. त्यावेळी निसर्गरम्य दृश्य टिपण्यासाठी अभिषेक कुशवाह याने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसामुळे परिसरातील जमीन अत्यंत निसरडी झाल्याने त्याचा तोल गेला आणि तो थेट ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळला.
रात्रभर सुरू होती शोधमोहीम
घटना घडताच अभिषेकच्या मित्रांनी स्थानिक ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुसळधार पाऊस, अंधार आणि दरीचा अवघड भूभाग यामुळे शोधकार्याला अडथळे येत होते. तरीही स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाने रात्रभर प्रयत्न सुरू ठेवले. अखेर सोमवारी पहाटे सुमारे ४ वाजता अभिषेकचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले.
प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन
या घटनेनंतर ठाणे आणि खोपोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात पर्यटनस्थळी भेट देताना सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. विशेषतः धोकादायक आणि निसरड्या ठिकाणी रिल्स किंवा सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. केवळ फोटो किंवा व्हिडिओसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये तसेच पर्यटनादरम्यान प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.