Parbhani Vadar Samaj: गौर गावातील वडार समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीच्या अभावामुळे सरस्वती सुरेश पवारंच्या उष्माघातामुळे मृत्यू झाल्यावर, त्याचा मृतदेह घेऊन तहसील कार्यालयावर आंदोलन सुरू
गौर येथील सरस्वती पवारचा उष्माघाताने मृत्यू;
स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी करत प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन, लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही
परभणी (Parbhani Vadar Samaj) : पूर्णा तालुक्यातील गौर गावात वडार समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने एका १२ वर्षीय मुलीच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न ऐरणीवर आला. सरस्वती सुरेश पवार हिचा उष्माघाताने मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईक व समाजबांधवांनी तिचा मृतदेह तिरडीवर घेऊन थेट पूर्णा तहसील कार्यालय गाठत आंदोलन छेडले. या घटनेमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून वंचित समाजाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पूर्णा तालुक्यातील गौर येथे वडार समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने एका १२ वर्षीय चिमुकलीच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा पेच निर्माण झाला. गौर येथील सरस्वती सुरेश पवार हिचा शुक्रवारी (१९ जून) पहाटे उष्माघातामुळे मृत्यू झाला. मात्र समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार कुठे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला.यामुळे संतप्त नातेवाईक आणि वडार समाजातील नागरिकांनी सरस्वतीचा मृतदेह तिरडीवर घेऊन थेट पूर्णा तहसील कार्यालय गाठले. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मृतदेह ठेवून त्यांनी प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले. "स्मशानभूमीच नाही, मग या मुलीला अग्नी कुठे द्यायचा?" असा सवाल करत महिलांनी आक्रोश व्यक्त केला.

वडार समाजाकडून (Parbhani Vadar Samaj) अनेक वर्षांपासून स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागेची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वारंवार अर्ज व निवेदने देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तहसीलदारांनी घटनास्थळी येऊन स्मशानभूमीसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मृतदेह ठेवण्यात आल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेमुळे वंचित समाजाच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, स्मशानभूमीच्या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.