विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधी निवडणुकीचे पडघम आता हळूहळू जोर धरू लागले आहेत.
हिंगोली (Vidhan Parishad Election) : विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधी निवडणुकीचे पडघम आता हळूहळू जोर धरू लागले आहेत. दोन जिल्ह्यांच्या या मतदारसंघात निम्म्यापेक्षा कमी मतदार असलेल्या हिंगोली जिल्ह्यातून इच्छुकांची संख्या मात्र मोठी आहे.
यापूर्वी स्वतंत्र हिंगोली जिल्ह्याला हे पद कधी मिळालेले नाही. हिंगोली जिल्ह्याच्या स्थापनेपूर्वी माजी मंत्री रजनीताई सातव या काँग्रेसतर्फे एकदा या मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या. त्यानंतरच्या काळात सुरेश देशमुख, रामप्रसाद बोर्डीकर, बाबाजानी दुर्राणी या परभणी जिल्ह्यातील नेत्यांना संधी मिळत गेली. सर्वात शेवटी या मतदारसंघात शिवसेनेचे विप्लव बाजोरिया हे थेट अकोला येथून येऊन आमदार झाले होते.
संख्याबळानुसार या जागेवर जिल्ह्याचा दावा होऊ शकत नाही, कारण परभणी जिल्ह्यातील मतदारांपेक्षा निम्मेच मतदार हिंगोली जिल्ह्यात आहेत. असे असले तरी पक्षाच्या नावावर जिल्ह्यातील अनेक पुढाऱ्यांनी या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.
सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा या जागेवर संख्याबळामुळे मजबूत मानला जात आहे. भारतीय जनता पक्षाकडे दुसऱ्या क्रमांकावर मतदार संख्या असल्याने दोन्ही जिल्ह्यांत उमेदवारांची मोठी चर्चा आहे. हिंगोलीतून तीन उमेदवार या जागेसाठी इच्छुक असल्याचे भाजपच्या सूत्रांनी कळविले आहे.
पूर्वीपासून ही जागा शिवसेनेकडे असल्याने शिवसेना शिंदे गट आपला दावा सांगत आहे. शिवसेनेकडे या जागेसाठी जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार आहेत. असे असले तरी वरिष्ठांनी घेतलेला निर्णय मान्य राहील, असे जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांनी स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीमध्ये या जागेसाठी हिंगोली जिल्ह्यात फारसा उत्साह दिसून येत नाही. परभणी जिल्ह्यातून मात्र डॉक्टर विवेक नावंदर यांच्या नावाची चर्चा आहे.
विधान परिषद निवडणुकीचे शंखनाद अजून व्हायचे असताना हालचाली मात्र दोन्ही जिल्ह्यांत सुरू झाल्या आहेत. ईद सणानिमित्त माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी आंब्याच्या पेटीतून मुस्लिम मतदारांना दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा रविवारी होणारा सत्कारही या निवडणुकीच्या नांदीचे संकेत मानले जात आहेत. आमदार राजू नवघरे या बैठकीत सर्व मतदारांशी संवाद साधणार आहेत. पक्षीय बलाबल पाहता महायुतीचे पारडे या निवडणुकीत जड वाटत आहे.
नेत्यांना सत्तेचे विकेंद्रीकरण चालेल का?
महायुतीतील काही पुढारी या निवडणुकांसाठी बैठका घेत असले तरी वरिष्ठ नेते त्यांना साथ देतील का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत युतीचे तीन आमदार आहेत. हिंगोली जिल्ह्यातून युतीतर्फे उमेदवारी एखाद्याला मिळाली आणि तो आमदार झाला तर पुढे तो सध्याच्या नेत्यांच्या नियंत्रणात राहील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्यास पक्षांतर्गत विरोधकांना बळ मिळेल, या भीतीपोटी आपल्या जिल्ह्यातून कोणालाच उमेदवारी मिळू नये याची खबरदारी हे तिन्ही आमदार घेतील का, अशी चर्चाही इच्छुकांमध्ये सुरू आहे.
बाजोरियांना पक्षांतर्गत विरोध?
मावळत्या सभागृहात हिंगोलीचे प्रतिनिधित्व करणारे आमदार विप्लव बाजोरिया हे अकोल्यातून आले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी हिंगोलीशी फारसा संपर्क ठेवला नसल्याने शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी आहे.
अशातच ईदनिमित्त हिंदू नगरसेवकांकडे दुर्लक्ष करून केवळ मुस्लिम नगरसेवकांशी संवाद साधल्याने ही नाराजी अधिक वाढल्याचे बोलले जात आहे. ही नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याच्या तयारीत काही असंतुष्ट कार्यकर्ते असल्याचेही समजते.