NCP Tree Plantation: राष्ट्रवादी काँग्रेसने वटसावित्री पौर्णिमाच्या उपलक्ष्याखाली जिल्ह्यातील गावातील १०१ वडांचे रोपांचं वाटप करण्यात आले. त्याशिवाय प्रत्येक गावात वडांच्या संगोपनासाठी स्पर्धा
वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसकडून १०१ वडाच्या रोपांचे वाटप
उत्कृष्ट संगोपन करणाऱ्या महिलेला पैठणीचे बक्षीस
चिखली (NCP Tree Plantation) : हिंदू संस्कृतीत वटसावित्री पौर्णिमेला सुवासिनी महिला पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करतात. या धार्मिक परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चिखली तालुक्याचे अध्यक्ष संतोष परिहार यांच्या पुढाकारातून तालुक्यातील विविध गावांमध्ये १०१ वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. श्रद्धेचे कृतीत रूपांतर करत प्रत्येकाने वडाचे झाड लावून त्याचे संगोपन करावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Tree Plantation) जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे म्हणाले, "पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड हा अत्यंत स्तुत्य आणि काळाची गरज असलेला उपक्रम आहे. वाढते तापमान, जंगलतोड आणि बदलते हवामान यामुळे भविष्यात गंभीर संकटे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे जतन करणे ही आजची गरज आहे. वटसावित्रीच्या दिवशी ज्या वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते, त्याच वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन केले तर श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड मिळेल. समाजाने धार्मिक परंपरा केवळ पूजेपुरत्या मर्यादित न ठेवता त्या पर्यावरण रक्षणाशी जोडल्या, तर निसर्ग संवर्धनाची मोठी चळवळ उभी राहू शकते."
ते पुढे म्हणाले, "वडाचे झाड भारतीय संस्कृतीत अक्षयत्व, दीर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वैज्ञानिकदृष्ट्याही ते अत्यंत महत्त्वाचे आहे. वड मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करतो, वातावरणातील कार्बन डायऑक्साइड व इतर प्रदूषित घटक शोषून घेतो, परिसरातील तापमान कमी करण्यास मदत करतो तसेच पक्षी, खारी, मधमाश्या आणि अनेक जीवांचे आश्रयस्थान ठरतो. एक वडाचे झाड अनेक पिढ्यांसाठी सावली, शुद्ध हवा आणि पर्यावरणाचे संरक्षण देणारा नैसर्गिक वारसा आहे. म्हणूनच वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या रोपांची निवड करण्यात आली."
या (NCP Tree Plantatio)n उपक्रमांतर्गत बेराळा, मुरादपूर, रामनगर, मेरा खुर्द, देऊळगाव घुबे, कोणड, अमोना, मंगरूळ आणि अंचरवाडी या गावांमध्ये एकूण १०१ वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक गावात रोपांचे संगोपन करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, पुढील वर्षी सर्वोत्कृष्ट पद्धतीने वडाचे झाड वाढविणाऱ्या महिलेचा पैठणी देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, तालुकाध्यक्ष संतोष परिहार, राजेंद्र सुरडकर, भगवान बाप्पू, अनंथा गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, रामेश्वर इंगळे, रमेश अवचार, मापारी ठेकेदार, ग्रामसेवक वीरसाहेब, रामदास मुजमुले, राजेंद्र घुबे, अमोल घुबे, विजय जावळे, प्रल्हाद इंगळे, गजानन पाटीलबा इंगळे, दत्तू गावडे, ग्रामसेवक सोळंकी, दामुअण्णा शिंदे, दत्तात्रय रुपसिंग परिहार, सतीश सोनुने, पांडुरंग भवर यांच्यासह विविध गावांतील सुवासिनी माता-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वटसावित्री पौर्णिमेच्या पावन पर्वावर धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.