जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जिल्ह्यात या देशव्यापी मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
हिंगोली (Van Mahotsav) : पर्यावरण संतुलन राखणे आणि वृक्षलागवडीला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने ३ जुलै रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भव्य प्रांगणात 'वन महोत्सव वृक्ष लागवड' कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जिल्ह्यात या देशव्यापी मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
यावेळी सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती पुष्पा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे जतन आणि संगोपन करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
वड, पिंपळ आणि उंबराच्या रोपांची लागवड
पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि दीर्घायुषी भारतीय वृक्षप्रजातींना प्राधान्य देत वड, पिंपळ आणि उंबर या पवित्र व औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची लागवड जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
वनीकरण विभागाचा सक्रिय सहभाग
वन महोत्सव कार्यक्रमात सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी संदीप शिंदे, वनपाल संदीप वाघ, गोपाल बिरसोने, वनरक्षक बालाजी जाधव, सूरज शेळके, सुनीता लोणे, देवराव दिपके, तसेच तुषार भालेराव आणि शाहू भालेराव यांनी सक्रिय सहभाग घेत वृक्षारोपण केले.
नागरिकांनाही वृक्षसंवर्धनाचे आवाहन
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..." या संतवचनाची आठवण करून देत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेला हा वृक्षारोपण कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. वन महोत्सवानिमित्त प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.