चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील संगणापूर येथे तेलंगणा वनविभागाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून पिकांची नासधूस केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील संगणापूर गावातील घटना
जिवती (चंद्रपूर) : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील संगणापूर गावात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर तेलंगणा राज्याच्या वनविभागाकडून ट्रॅक्टर फिरवून पिकांची नासधूस करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यात तेलंगणा राज्याच्या वनविभाग व पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतात ट्रॅक्टर फिरवून उभे पीक उद्ध्वस्त केल्याचे दिसत आहे.

विश्वसनीय माहितीनुसार, संबंधित जमिनीवर वृक्षलागवड करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दाव्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. तरीही या घटनेमुळे सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये अशा प्रकारची कारवाई झाल्याचा दावा अत्यंत गंभीर मानला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय व भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक स्तरावर जोर धरत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत तेलंगणा वनविभाग, पोलीस प्रशासन किंवा संबंधित जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची भूमिका आणि प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.