सोशल मीडियावरून उदयास आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने (सीजेपी) आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
चंद्रपूर (Sudhir Mungantiwar) : सोशल मीडियावरून उदयास आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने (सीजेपी) आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेतली आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
सामान्य नागरिकांच्या भावना दुखावतील अशा शब्दांचा वापर सार्वजनिक जीवनात टाळला पाहिजे, असे मत व्यक्त करताना मुनगंटीवार यांनी न्यायालयातील एका वक्तव्याचा संदर्भ दिला. "देशातील तरुणांना अवमानकारक उपमा दिली जाते, तेव्हा त्यांच्या मनात नाराजी निर्माण होते आणि अशाच भावना अशा प्रकारच्या आंदोलनांना जन्म देतात," असे ते म्हणाले.
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कोणतीही चळवळ किंवा प्रयोग यशस्वी होण्यासाठी योग्य दिशा, संघटनात्मक रचना आणि व्यवस्था आवश्यक असते. केवळ नाराजी व्यक्त करून पर्याय निर्माण होत नाही. भाजपने त्याग, तपस्या आणि बलिदानाच्या जोरावर आपली संघटनात्मक ताकद उभी केली असून सीजेपी हा भाजपचा पर्याय ठरू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुनगंटीवार म्हणाले की, या संपूर्ण घटनेतून सर्वांनी एक धडा घ्यायला हवा. सार्वजनिक पदावरील व्यक्तींनी बोलताना जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. सामान्य माणसांच्या भावना दुखावतील असे शब्द वापरल्यास त्याचे परिणाम समाजात उमटू शकतात.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगरसेवकांना पैसे वाटप झाल्याच्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. "छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठेचा आदर्श दिला. जर कार्यकर्ते पैशांच्या मोहाला बळी पडत असतील, तर त्यांना निष्ठेचे संस्कार देण्याची जबाबदारी संबंधित पक्षांची आहे," असे त्यांनी म्हटले. भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणीही मोहात पाडू शकत नसल्याचा दावाही त्यांनी केला.
यावेळी विधान परिषद निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेवरही मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली. "आचारसंहिता म्हणजे शोले चित्रपटातील नवा गब्बरसिंग बनली आहे. तिच्या नावाखाली सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर बैठका घेणे आणि विकासकामांबाबत निर्णय घेणेही कठीण झाले आहे," अशी टीका त्यांनी केली.
नगरसेवक हे पक्षनिष्ठ असतात, त्यामुळे निवडणुकीच्या काळात सामान्य जनतेच्या कामांवर निर्बंध घालण्याचे कारण समजत नाही. आचारसंहितेच्या अतिरेकामुळे लोकांना त्रास होत असेल तर भविष्यात जनतेतून त्याविरोधात आवाज उठेल, असा इशाराही मुनगंटीवार यांनी दिला.