Bhairoba Rathotsav: सोनारीतील श्री काळभैरवनाथाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आणि आंध्रप्रदेशातून हजारो भाविक उपस्थित होते.
भूम (Bhairoba Rathotsav) : रखरखत्या उन्हात 'भैरोबाच्या नावानं चांगभलं, भैरोबाच्या घोड्याचं चांगभल' च्या जयघोषात गुलाल व खोबऱ्याची उधळण करीत परंडा तालुक्यातील श्रीक्षेत्र सोनारीच्या काळभैरवनाथांचा रथोत्सव बुधवारी (दि.१५) हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. मागील तीन दिवसात लाखो भाविकांनी श्री काळभैरवनाथांचे दर्शन घेतले.
परंडा तालुक्यातील श्रीक्षेत्र सोनारी येथील काळभैरवनाथ महाराष्ट्रसह आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. चैत्र महिन्यातील यात्रेला भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येथे दर्शनासाठी दाखल होतात. मागील तीन दिवसांपासून यात्रेला सुरूवात झाली आहे. १५ एप्रील रोजी काळभैरवनाथाच्या रथोत्सवानिमित्त दुपारी अडीच वाजता मुख्य रथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, जि. प. कृषी पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसाडे, बाळासाहेब पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, सुभाषसिंह सद्दीवाल, नवनाथ आप्पा जगताप ,संभाजी सूरवसे, परमेश्वर मांडवे, युवराज पाटील, तहसीलदार निलेश काकडे, सोनारी देवस्थानचे मुख्य पुजारी संजय महाराज, मयूर पुजारी, समीर पुजारी, आंभी पोलीस ठाण्याचे सपोनि गोरक्षनाथ खरड यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती. काळभैरवनाथाच्या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून भाविकांनी उपस्थिती लावली. तसेच काळभैरवनाथाचे दर्शन घेऊन हजारो भाविकांनी आपले नवस पूर्ण केले, तर कांही भाविकांनी देवाला आपल्या इच्छापूर्तीसाठी साकडे घातले. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाला देखील भाविकांनी न जुमानता भैरवनाथाचे दर्शन घेतले.
यात्रेच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व तयारी केली असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची सोय करण्यात आली होती.
अवैध धंदे व पाकीटमारांचा सुळसुळाट
श्रीक्षेत्र सोनारी येथील काळ भैरवनाथाच्या यात्रेत अवैध धंदे. चक्री, चिमणी पाखरु चिठ्ठी, सुरट, लाल काळा टायगर यासह देशी दारु राजरोसपणे सुरु होती. तर यात्रेत भाविकांची खिशातील पाकीटे, मोबाईल चोरी, व्यापाऱ्यांचा गल्ला चोरीला गेल्याच्या घटना आहे . त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
कंडारीची कावड आणि भोंजाचा मानाचा नाडा
श्री क्षेत्र सोनारी येथील श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रेत 'कंडारी येयील मानाची कावड तर भोंजा' गावाच्या मानाच्या नाड्याला विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार काळभैरवनाथाची (Bhairoba Rathotsav) कावड व नाडा आल्याशिवाय रथोत्सवाची सुरवात होत नाही. भोंजा गावातून नाडा येत नाही आणि तो रथाला बांधला जात नाही, तोपर्यंत रथ ओढण्यास सुरुवात होत नाही.