कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून कुडाळ नगरपंचायतीतील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका संध्या प्रसाद तेरसे यांनी पक्षासह नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.
हिंदू कॉलनीतील १४१ गुंठे जमीन प्रकरणावर प्रशासनाविरोधात नाराजी; कारवाई न झाल्याने नगरसेवकपदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून कुडाळ नगरपंचायतीतील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका संध्या प्रसाद तेरसे यांनी पक्षासह नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपमधून बाहेर पडत असताना त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून पुढील राजकीय वाटचाल कोणत्या पक्षासोबत करणार, याबाबत मात्र त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ नगरपंचायतीतील सत्ताधारी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका संध्या प्रसाद तेरसे यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यांच्या या निर्णयामुळे कुडाळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजपसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
राजीनाम्यामागील कारण स्पष्ट करताना संध्या तेरसे यांनी हिंदू कॉलनी परिसरातील नगरपंचायतीच्या ताब्यात असलेली १४१ गुंठे जमीन मुख्याधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नगरपंचायतीच्या ताब्यातून गेल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई व्हावी आणि जमीन पुन्हा नगरपंचायतीच्या ताब्यात यावी, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
या मागणीसाठी त्यांनी १० जुलै रोजी नगरपंचायतीसमोर उपोषणही केले होते. त्यांच्या आंदोलनाला कुडाळमधील विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. तसेच नगरपंचायतीच्या विशेष सभेतही त्यांनी हा मुद्दा ठामपणे मांडत प्रशासनाकडून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली होती.
याशिवाय त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, जमीन गैरव्यवहारासंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी नाराजी व्यक्त करत नगरसेवकपदाचा राजीनामा सादर करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या पावलामुळे कुडाळ आणि सिंधुदुर्गमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून आगामी काळात त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.