महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
मुंबई (Shivsena Politics) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः पुढे येत आपली भूमिका स्पष्ट केली असून, शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी लढण्यासाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, काल–परवा झालेल्या चर्चांमध्ये उपस्थित केलेल्या बहुतांश मुद्द्यांवर शिवसेनेकडून सहमती दर्शवण्यात आली आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला असून, माझे काम प्रामाणिकपणेच सुरू राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकरी–दिव्यांगांच्या प्रश्नांवर भर
कडू यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या, हमीभाव, तसेच कृषी व्यवस्थेतील सुधारणांवर विशेष भर दिला. पेरणीपासून कापणीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया एमआरजेएस प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना न्याय्य हमीभाव मिळण्यासाठी ठोस सुधारणा आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तसेच, लाडकी बहीण योजनेतील विधवा महिलांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. “लाडकी बहिण योजनेतील अनेक विधवा बहिणी अद्याप लाभापासून वंचित आहेत, हे वास्तव आहे,” असे ते म्हणाले.
दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय अस्तित्वात आले असले तरी त्याचे अपेक्षित बळकटीकरण झाले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. दिव्यांगांसाठीच्या योजना अधिक प्रभावी आणि परिणामकारक करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेसोबतची नवी वाटचाल
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग मंत्रालयाला बळ मिळत असेल, तर त्यासाठी पूर्ण सहकार्य राहील, असे बच्चू कडू यांनी सांगितले. शिवसेनेची राजकीय ताकद वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, या निर्णयासोबत त्यांनी स्पष्ट केले की शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. “समझोता फक्त राजकारणापुरता नाही, तर जनतेच्या हितासाठीच असेल,” असे ते म्हणाले.
प्रहार संघटना कायम राहणार
प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम स्वतंत्रपणे कार्यरत राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेत प्रवेश झाला तरीही या संघटनांच्या माध्यमातून सामाजिक काम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या बळकटीकरणासाठी स्वतःचा संपूर्ण सहभाग देणार असल्याचे सांगताना त्यांनी भावनिक शब्दांत म्हटले की, “माझ्या शरीरातील प्रत्येक रक्ताचा थेंब शिवसेना आणि शेतकऱ्यांसाठी वाहील.”
जुना राजकीय प्रवास आणि आठवणी
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना बच्चू कडू यांनी सांगितले की, त्यांनी पूर्वीही शिवसेनेतून राजकीय प्रवास केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना कर्जमाफीबाबत लिहिलेले पत्र तसेच कापसाच्या दरासंदर्भात दिलेला राजीनामा याचा त्यांनी उल्लेख केला.
शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी लढण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेच्या व्यासपीठावरून सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याने बच्चू कडू यांच्या राजकीय भूमिकेला नवे वळण मिळाले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.