मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक मार्गावर सोमवारी मध्यरात्री सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने दोन्ही दिशांतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
एमएसआरडीसीकडून युद्धपातळीवर मलबा हटविण्याचे काम सुरू; अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे तात्काळ अलर्ट मिळाल्याने वाहतूक वेळेत वळवली
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक मार्गावर सोमवारी मध्यरात्री सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने दोन्ही दिशांतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या घटनेनंतर पुण्याकडे जाणारी तसेच मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक तातडीने बंद करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे.
घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, दरड कोसळली असली तरी मिसिंग लिंकच्या मुख्य टनेलच्या संरचनेला कोणतेही नुकसान झालेले नाही. आवश्यक साफसफाई आणि सुरक्षा तपासणीनंतर पुणे-मुंबई मिसिंग लिंक मार्गही लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, दरड हटविण्याचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते तीन तास लागू शकतात. त्यानंतर वाहतूक कधी आणि किती मार्गिकांवर सुरू करायची, याबाबतचा अंतिम निर्णय पोलीस विभाग आणि वाहतूक यंत्रणा परिस्थितीचा आढावा घेऊन घेतील. प्रवाशांची सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याने कोणताही धोका पत्करला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, सततचा पाऊस, दाट धुके आणि जोरदार वारा यामुळे डोंगरावरील परिस्थितीचा थेट आढावा घेणे कठीण होत आहे. मात्र, हवामानातील अडचणी असूनही संबंधित यंत्रणा शक्य तितक्या वेगाने काम करत असून, परिस्थिती सुरक्षित झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.
घटनेदरम्यान वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही शिवेंद्रराजे भोसले यांनी उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, मिसिंग लिंकवर बसविण्यात आलेले कॅमेरे, सॉफ्टवेअर आणि निरीक्षण प्रणालीमुळे दरड कोसळताच रात्री ३.३० वाजता नियंत्रण कक्षाला तात्काळ माहिती मिळाली. त्यानंतर कंट्रोल रूमने विलंब न करता अलर्ट जारी केला आणि वाहतूक सुरक्षितपणे पर्यायी मार्गावर वळविण्यात आली.
"निसर्गाच्या घटनांवर कोणाचेही नियंत्रण नसते. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेळीच माहिती मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली. दोन्ही बाजूंच्या मार्गिकांची संपूर्ण सुरक्षा तपासणी करूनच वाहतूक सुरू केली जाईल," असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले असून, हवामान आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचेही सांगितले आहे.