रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी (२० जून) सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत छत्रपती संभाजीनगर येथील पाच तरुण समुद्रात बेपत्ता झाले आहेत.
पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने प्रवाहात वाहून गेले; प्रशासन, पोलीस व मच्छीमारांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम
रत्नागिरी (Sea Drowning) : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी (२० जून) सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत छत्रपती संभाजीनगर येथील पाच तरुण समुद्रात बेपत्ता झाले आहेत. समुद्रातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे पाचही जण पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आला होता. सुटीचा आनंद घेण्यासाठी सर्वजण समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. यावेळी काही जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाच तरुण समुद्राच्या प्रवाहात वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक मच्छीमार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी बोटींच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, समुद्रातील वेगवान प्रवाह आणि उंच लाटांमुळे बचावकार्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याची माहिती मिळाली आहे.
बेपत्ता पर्यटकांची नावे
- आदित्य राऊत
- यश कांबळे
- अनिकेत हिवराळे
- प्रेम आदमाने
- आनंद नरवडे
या पाचही तरुणांचा शोध सुरू असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पर्यटकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.