भारतीय हवामान विभागाने (IMD) यवतमाळ जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
IMD च्या मुसळधार पावसाच्या अंदाजानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आदेश; नागरिक आणि शेतकऱ्यांनाही प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन
यवतमाळ : भारतीय हवामान विभागाने (IMD) यवतमाळ जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विकास मीना यांनी शुक्रवार, 31 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. हा आदेश शासकीय, अनुदानित आणि खासगी अशा सर्व शैक्षणिक संस्थांना लागू राहणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थिती आणि त्यातून उद्भवू शकणाऱ्या धोक्याचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, पाण्याखाली गेलेले रस्ते किंवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सततच्या पावसामुळे विविध भागांमध्ये परिस्थिती बदलू शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला असून पुढील काही दिवस पावसाच्या सरी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. IMD च्या अंदाजानुसार 30 ते 31 जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची, तर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने शेतकऱ्यांनाही महत्त्वाचे आवाहन केले आहे. आगामी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची सर्व कामे योग्य नियोजनाने करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.