Sant Gajanan Maharaj Palkhi: श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे रिसोड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. पालखी आगमनानिमित्त संपूर्ण शहर भक्तिमय वातावरण
रिसोड (Sant Gajanan Maharaj Palkhi) : श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे रिसोड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. पालखी आगमनानिमित्त संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि जयघोषात पालखी शिस्तबद्ध पद्धतीने शहरात दाखल झाली.पालखीच्या स्वागतासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत भक्तांसाठी पिण्याचे पाणी, फराळ तसेच अन्य आवश्यक साहित्याचे वाटप केले. सामाजिक बांधिलकी जपत अनेक स्वयंसेवकांनी सेवाभावाने सहभाग नोंदविला.
पालखी दर्शनासाठी रिसोड शहरासह ग्रामीण भागातून आणि इतर जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक शहरात दाखल झाले. (Sant Gajanan Maharaj Palkhi) पालखी मार्गावर ठिकठिकाणी भक्तांनी फुलांची उधळण करत आणि महाराजांचा जयघोष करत स्वागत केले.भक्तांच्या उत्साहामुळे शहरातील वातावरण पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. सर्वत्र “गण गण गणात बोते” चा जयघोष घुमत असून श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. सदर पालखीच्या शहर मध्ये दाखल होण्यापासून बाजार समितीमध्ये मुक्कामापर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी वारंवार चोरांपासून सावधान राहण्याच्या सूचना देण्यात येत होत्या.

रिसोड शहरातील नगरपरिषद पोलीस स्टेशन तर्फे वारकऱ्यांना विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले नगरपरिषद व पोलीस स्टेशन यांनी आपापले स्टॉल लावून सदर साहित्य वाटप केले यावेळी ठाणेदार रामेश्वर चव्हाण, मुख्याधिकारी सतीश शेवदा नगराध्यक्ष भगवानदादा क्षीरसागर नगरसेवक व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते
रिसोड शहरात पालखीचे (Sant Gajanan Maharaj Palkhi) आगमनापूर्वी भाविकांनी रस्त्यावर स्वच्छता करून रांगोळी काढत फटाक्याची आतिषबाजी करून पालखीचे भव्य स्वागत केले.यावेळी पालखी ही शहरातील लोणी फाटा येथे असताना वरून राजाने पावसाची हजेरी लावली या ठिकाणी वातावरण अगदी थंडगार झाले होते. दिवसभरच्या उकाड्यानंतर वारकरी व भक्तांना या पावसामुळे दिलासा मिळाला