रमाई आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत राबविण्यात आलेल्या रमाई आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. विधान परिषदेत बोलताना त्यांनी या योजनेत बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ मिळवून देण्यात आल्याचा दावा केला. या प्रकरणाचा मुद्दा यापूर्वी माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही उपस्थित केला होता, असे त्यांनी सांगितले.
अंबादास दानवे यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेतील लाभार्थ्यांमध्ये भाजपच्या एका नगरसेविकेच्या मुलाचाही समावेश आहे. तसेच संबंधित नगरसेविकेच्या पतीच्या नावावर विविध बँकांमध्ये ३३ खाती असून, त्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय, घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या व्यक्तींनाच संबंधित कामे देण्यात आल्याचा दावा करत दानवे यांनी एका शैक्षणिक संस्थेला योजनेची कामे देण्यात आल्याचा आरोप केला. काही लाभार्थ्यांची नावे हाताने लिहून योजनेत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच देवगिरी पतसंस्था आणि एका फायनान्स संस्थेच्या नावावरून बिले काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
विधान परिषदेत बोलताना दानवे यांनी आणखी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने टॅक्स पावत्या, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र आणि अनुसूचित जाती (SC) प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचा दावा केला. फडणवीस यांच्या नावावरील दस्तऐवजांमध्ये त्यांचा पत्ताही नमूद असल्याचा आरोप त्यांनी केला.
दानवे यांनी पुढे सांगितले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये १,९८५ रुपयांची कर थकबाकी दर्शविणारी टॅक्स पावतीही या दस्तऐवजांमध्ये आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नावावरील रेशन कार्डमध्ये त्यांची पत्नी, पुत्र श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी आणि मुलाचेही नाव नमूद असल्याचा दावा त्यांनी विधान परिषदेत केला.
या सर्व दस्तऐवजांच्या आधारे रमाई आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली.