राज्यातील हरभरा आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत केंद्र सरकारने हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात वाढ करण्यासह खरेदी प्रक्रियेलाही मुदतवाढ दिली आहे.
रखडलेली खरेदी पुन्हा सुरू होणार; शेतकरी वर्गात समाधान
सेलू (Rabi Crop Procurement 2026) : राज्यातील हरभरा आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत केंद्र सरकारने हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात वाढ करण्यासह खरेदी प्रक्रियेलाही मुदतवाढ दिली आहे. तांत्रिक अडचणींमुळे रखडलेली खरेदी आता पुन्हा वेगाने सुरू होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार, हरभरा खरेदीसाठी पूर्वी मंजूर असलेले ७ लाख ६१ हजार २५० मेट्रिक टन उद्दिष्ट वाढवून आता ८ लाख १९ हजार ८८२ मेट्रिक टन करण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त ५८ हजार ६३२ मेट्रिक टन हरभरा हमीभावाने खरेदी केला जाणार आहे.
शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी प्रक्रियेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. रब्बी २०२६ अंतर्गत हरभरा खरेदीची मुदत आता २९ मे २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर खरीप २०२५-२६ अंतर्गत तूर नोंदणीसाठी २५ मे २०२६ आणि तूर खरेदीसाठी ३१ मे २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
सिंदी (सेलू) कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील विविध बाजार समित्यांनी नाफेडकडे ‘लॉट एन्ट्री’ आणि पोर्टलच्या तांत्रिक अडचणींबाबत पाठपुरावा केला होता. सिंदी बाजार समितीत ६२८ नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी ३१८ शेतकऱ्यांचे शेड्युलिंग बाकी होते, तर २८८ क्विंटल मालाची लॉट एन्ट्री पोर्टल बंद असल्याने अडकली होती.
“पोर्टल बंद असल्याने अनेक शेतकरी चिंतेत होते. आता मुदतवाढ मिळाल्यामुळे प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्याचा माल हमीभावाने खरेदी केला जाईल. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदीचे सभापती केशरीचंद खंगारे यांनी केले.
खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. आता खरेदी उद्दिष्ट वाढ आणि मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून खरेदी केंद्रांवर पुन्हा लगबग वाढण्याची शक्यता आहे, असे मत मुख्याधिकारी महेंद्र अ. भांडारकर यांनी व्यक्त केले.