पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनोखी पुढाकार घेत दुचाकीवरून थेट विधान भवन गाठले.
मुंबई (Political Buzz) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनोखी पुढाकार घेत दुचाकीवरून थेट विधान भवन गाठले. त्यांच्या सोबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार देखील दुचाकीवरून प्रवास करताना दिसले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः ‘रॉयल एनफिल्ड ३५०’ ही बाईक चालवत विधान भवनात प्रवेश केला. विशेष म्हणजे, त्यांच्या सुरक्षेसाठी असलेला ताफाही यावेळी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसून आला. विधानपरिषदेच्या १० नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सर्व नेते, मंत्री आणि आमदार विधान भवनात दाखल झाले होते.
मिश्किल व्हिडिओची चर्चा
या दरम्यान, मंत्री आशिष शेलार आणि Anil Parab यांच्यातील ८ ते १० सेकंदांचा मिश्किल संवाद सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये शेलार, परब यांना टाळी देत म्हणतात, “एवढ्या गाड्या कमी केल्या... एक दिवस चालत यावं लागेल आणि मग सुरक्षारक्षकाला खांद्यावर घ्यावं लागेल.” यावर परब हसून प्रतिसाद देतात आणि दोघेही हसत पुढे जातात.
हा व्हिडिओ शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला असून त्यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका करत म्हटले की, “घोर अनर्थ..! भाजपचे मंत्रीच मोदींच्या आवाहनाची टिंगल उडवत आहेत.”
इलेक्ट्रिक वाहनांकडे कल, दुचाकीचा पर्याय समोर
सध्या अनेक मंत्री आणि आमदार इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करत असताना, मुख्यमंत्र्यांनी दुचाकीचा पर्याय निवडत एक वेगळा संदेश दिला आहे. मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी आणि इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी दुचाकीचा वापर हा प्रभावी उपाय ठरू शकतो, असे या कृतीतून सूचित करण्यात आले.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था असूनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेल्मेट परिधान करून, नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने प्रवास पूर्ण केला. त्यांच्या या कृतीमुळे सामान्य नागरिकांमध्ये इंधन बचतीबाबत सकारात्मक संदेश पोहोचल्याचे बोलले जात आहे.